करोनाबाधितांचा ट्रेंड बदलता; लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, February 28, 2021

करोनाबाधितांचा ट्रेंड बदलता; लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका

https://ift.tt/3bPrIdG
म. टा. खास प्रतिनिधी, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील करोनाबाधितांचा 'ट्रेंड' बदलला असून, लक्षणे नसणाऱ्यांपेक्षा लक्षणे असणाऱ्यांतच बाधित आढळणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. लक्षणांकडे केलेले दुर्लक्ष बाधितांना अत्यवस्थ स्थितीत घेऊन जात असल्याची धक्कदायक माहिती पुढे आली आहे. सर्दी, खोकल्यासारख्या लक्षणांमुळे यापूर्वी केलेल्या करोना निदान चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने आपण निश्चिंत झाला असाल. त्यानंतर पुन्हा तशीच लक्षणे असल्याने हा वातावरण बदलाचा परिणाम आहे असे वाटणेही स्वाभाविक आहे. परंतु, मनाची समजूत घालून लक्षणांकडे होणारे दुर्लक्ष जीवघेणे ठरू शकते, ही बाब यामुळे अधोरेखित झाली आहे. जिल्ह्यात पहिला बाधित रुग्ण २८ मार्च २०२० रोजी आढळून आला होता. शुक्रवार (दि. २६)पर्यंत एकूण करोनाबाधितांची संख्या एक लाख २१ हजार ८०२ पर्यंत पोहोचली आहे. त्यापैकी ९६.१८ टक्के लोक म्हणजेच एक लाख १७ हजार १४५ लोक करोनामुक्त झाले आहेत. करोना संसर्गाची लक्षणे ही सुरुवातीपासूनच अत्यंत सामान्य राहिली आहेत. सर्दी, खोकला, ताप आणि त्यानंतरच्या स्थितीत श्वास घेण्यास त्रास होणे ही त्यातल्या त्यात अत्यंत प्रमुख लक्षणे आहेत. जिल्ह्यात पहिला बाधित रुग्ण आढळला तेव्हापासून आजतागायत वेगवेगळी लक्षणे आढळत गेली. त्यामध्ये जुलाब, मळमळणे, उलट्या, डोकेदुखी, पोटदुखी, इतकेच नाही तर पेशी कमी होणे यांसारखी लक्षणेदेखील काही रुग्णांमध्ये आढळली होती. लक्षणे असणारे ५० टक्के बाधित जिल्ह्यात करोना संसर्गाची सुरुवात झाली तेव्हापासून साधारणत: डिसेंबरपर्यंत लक्षणे असणाऱ्यांपेक्षा लक्षणे नसणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक होती. केवळ ३० टक्के रुग्णांमध्येच लक्षणे आढळून येत होती, तर ७० टक्के रुग्णांना कोणतीच लक्षणे नसतानाही त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह राहिल्याचे निष्कर्ष आरोग्य यंत्रणांनी काढले. परंतु, बाधितांचा 'ट्रेंड' आता बदलू लागला आहे. लक्षणे असणारे बाधित आढळण्याचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत गेले आहे. त्यामुळे नागरिकांनी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तपासणी करवून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. संसर्गाची सुरुवात झाली तेव्हापासून लक्षणे असणाऱ्यांचे प्रमाण कमी राहिले. परंतु, आता हे प्रमाण २० टक्क्यांनी वाढले आहे. घरीच उपचार घेऊन बरे होता येते हा विश्वासही दुणावल्याचेही पाहावयास मिळत आहे. आजार बळावू नये याकरिता लक्षणे जाणवताच कोव्हिड निदान चाचणी करवून घेणे आवश्यक आहे. -सूरज मांढरे, जिल्हाधिकारी