ऐन उन्हाळ्यात गारपीट, पिकांचे मोठे नुकसान - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, March 21, 2021

ऐन उन्हाळ्यात गारपीट, पिकांचे मोठे नुकसान

https://ift.tt/3r7Oraq
म. टा. प्रतिनिधी नगर: निसर्गाचा समतोल बिघडल्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. ऐन उन्हाळ्यात पिकांची काढणी सुरू असताना वादळी वाऱ्यांसह झाली. त्यामुळे काढणीला आलेल्या आणि काढणी झालेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी शनिवारी सायंकाळी आणि रात्री गारपीट झाली. शेतात आणि रस्त्यांवरही गारांचा खच पडला होता. हवामान विभागाने गारांसह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला होताच, तो खरा ठरला. आधीच करोनामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना या दुसऱ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. नगर, पाथर्डी, शेवागाव, नेवासा, संगमनेर, अकोले या भागात शनिवारी पाऊस झाला. अनेक ठिकाणी गाराही पडल्या. यामुळे डाळिंब, गहू, हरभरा, भाजीपाल्यासह आंब्याचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे शेतीचही मोठे नुकसान झाले, तर काही ठिकाणी घरांचीही पडझड झाली आहे. अनेक ठिकाणी सुमारे अर्धातास गारांचा पाऊस सुरू होता. हरभऱ्याच्या आकाराएवढ्या गारा बरसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या अनेक ठिकाणी गव्हाची काढणी सुरू आहे. शेतात काढून ठेवलेल्या पिकाचे आणि काढणीला आलेल्या उभ्या पिकाचे यामुळे नुकसान झाले. पावसात भिजलेला गहू आता पांढरा पडण्याची शक्यता असल्याने त्याला भाव कमी मिळणार आहे. फळबागांचेही नुकसान झाले आहे. आंब्याला आलेला मोहर वादळ आणि गारांमुळे गळून पडला आहे. डाळींब, द्राक्ष या पिकांचेही नुकसान झाले. गेल्या वर्षी अतिवृष्टीनंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले होते, त्याची नुकसानभारपाईही अनेक शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही. त्यातच आता पुन्हा नव्याने नुकसान झाले आहे. करोनाच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला शेतीनेच तारल्याचे आढळून आले. असे असले तरी या काळात शेतीवर अनेक नैसर्गिक संकटे येऊन गेली. अवकाळी पाऊस, वादळ, अतिवृष्टी आणि आता गारपीट यामुळे शेतीचे प्रत्येक हंगामात मोठे नुकसान होत आले आहे. करोनाच्या संकटाकडे दुर्लक्ष करीत शेतात राबवत आहे. मात्र, दर हंगामात पीक काढणीला आले की असे संकट येत असल्याचा अनुभव येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे.