दुथडी भरुन वाहणाऱ्या नद्यांचं पाणी दुष्काळी भागात; पहिल्या नदीजोड प्रकल्पाची मुहूर्तमेढ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, March 22, 2021

दुथडी भरुन वाहणाऱ्या नद्यांचं पाणी दुष्काळी भागात; पहिल्या नदीजोड प्रकल्पाची मुहूर्तमेढ

https://ift.tt/2Pgq1i0
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक जल दिनाच्या निमित्ताने जल शक्ती अभियानाची सुरुवात करणार आहेत. देशभरातील शहरी आणि ग्रामीण भागात या अभियानाचा शुभारंभ केला जाणार आहे. या अभियानांतर्गत पावसाच्या पाण्याचा सदुपयोग करण्याचा संकल्प ठेवण्यात आला आहे. यासोबतच देशातील पहिल्या नदीजोड प्रकल्पाची मुहूर्तमेढ आज रोवली जाईल. या प्रकल्पामुळे पाण्याचा अधिशेष असलेल्या भागातील पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्यात येणार आहे. केंद्रीय जलमंत्री, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्यात पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत नदीजोड प्रकल्पाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी होईल. राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पात केन बेतवा हा पहिला जोडणी प्रकल्प ठरणार आहे. नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून अधिशेष असलेल्या भागाचं पाणी दुष्काळी भागात वळवण्याचं स्वप्न दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पाहिलं होतं. या कराराच्या माध्यमातून नदीजोड प्रकल्पासह राज्याराज्यांमधील समन्वय वाढण्यास सुरुवात होईल. या प्रकल्पात केन नदीतून बेतवा नदीत पाणी वळवलं जाईल, ज्यासाठी दौधन बंधारा बाधला जाईल आणि कालवे जोडले जातील, अशी माहिती देण्यात आली आहे. बुंदेलखंड या नेहमी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या भागासाठी या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे. विशेषतः पन्ना, टिकमगड, छतरपूर, सागर, दामोह, दातिया, विदिशा, शिवपुरी आणि मध्य प्रदेशला लागून असलेल्या बांदा, महोबा, झासी आणि उत्तर प्रदेशच्या ललितापूरसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असेल. या प्रकल्पाने नदीजोड प्रकल्पांची सुरुवात होईल आणि इतर अनेक नद्याही एकमेकांना जोडल्या जातील, ज्यामुळे दुष्काळ हा विकासातील सर्वात मोठा अडथळा दूर केला जाईल.