
म. टा. विशेष प्रतिनिधी, गोरेगाव गोरेगावच्या चित्रनगरीमध्ये १९९४पासून 'उचल्या'कार यांनी उदरनिर्वाहासाठी राज्य सरकारने दिलेल्या जागेवर उपाहारगृह सुरू केले आहे. या जागेचे भाडे पूर्वी २५ हजार रुपये होते. मात्र आता हे भाडे २ लाख ३६ हजार रुपये दाखवण्यात आले असून, तब्बल ७५ लाख रुपयांची थकबाकी दाखवली आहे. हे भाडे न भरल्याने तेथील वीज आणि पाणी कापले आहे. 'मोठ्या निर्मात्यांना केवळ १० रुपये प्रति चौरस फूट भाडे आणि साहित्यिकाला २०० रुपये प्रति चौरस फूट भाडे हा कोणता न्याय आहे', असा सवाल करीत, साहित्यिक लक्ष्मण गायकवाड गेल्या तीन दिवसांपासून पत्नीसह उपोषणाला बसले आहेत. सोमवारी त्यांच्या उपाहारगृहावर कारवाई होण्याची शक्यता असल्याने त्यांनी उपाहारगृहाला आतून कुलुप लावून घेतले आहे. वाचा: गायकवाड यांना २०१६च्या उपोषणानंतर करार वाढवून मिळाला. हा करार २०१७मध्ये संपला. त्यावेळी पुन्हा दहा वर्षांचा करार करावा, असे प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र तत्कालीन सरकारने एकच वर्षाचा करार केला आणि २०१८पासून भाडे घ्यायचे बंद केले. त्यानंतर दोन वर्षांची थकबाकी दाखवण्यात आली आणि नोव्हेंबर, २०२०मध्ये कारवाई केली. करारानुसार दहा टक्के भाडेवाढ द्यायला तयारी असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. मात्र त्याऐवजी २०० टक्के भाडेवाढ लावण्यात आली आहे. ही भाडेवाढ परवडणारी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. शनिवारी काही अधिकारी परिस्थितीची पाहणी करून गेले; मात्र सोमवारी कारवाई होईल असा त्यांचा अंदाज आहे. नामवंत साहित्यिकांचे आवाहन राज्य सरकारच्या या भूमिकेविरोधात अनेक साहित्यिकांनी मुख्यमंत्री आणि मराठी भाषा मंत्र्यांना आवाहन केले आहे. गेल्या २५ वर्षांपासून हे उपाहारगृह चालवल्यानंतर आता टाळे ठोकण्याचे कारण काय, अशीही विचारणा करण्यात आली आहे. या प्रकरणी लक्ष घालण्याचे आवाहन करून त्यांची उपजीविका टिकेल, अशी आशा अर्जुन डांगळे, जयंत पवार, अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, डॉ. महेश केळुसकर, प्रज्ञा दया पवार, नीरजा, किशोर कदम, शाहीर संभाजी भगत, सुबोध मोरे आदींनी व्यक्त केली आहे. वाचा: