म. टा. वृत्तसेवा, पालघर नगर परिषद क्षेत्रातील कीर्ती बाफना या बिल्डरच्या मुलाच्या लग्नासाठी जयपूर येथे चार्टर्ड विमानाने गेलेल्यांपैकी आत्तापर्यंत २२ जण संसर्गाने बाधित झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. विमानाने गेलेल्या १८० वऱ्हाडींपैकी तिघांना करोनाची लागण झाल्याचे गेल्या आठवड्यात आढळून आले होते. पालघर तालुक्यातील डॉक्टर, वकील, बिल्डर, कारखानदार, मोठे व्यावसायिक, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आदी १८०हून अधिक जण ८ व ९ मार्च रोजी जयपूर येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्याला गेले होते. हे सर्व नागरिक एका चार्टर्ड विमानाने गेले होते. विवाह आटोपून हे सर्वजण १० मार्च रोजी पालघरला परतल्यानंतर त्यापैकी तीन जणांना करोना संसर्गाची बाधा झाल्याचे उघड झाले होते. त्यामुळे उर्वरित सर्वांची करोना चाचणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. त्यानुसार १३ मार्च रोजी ४७ जणांची करोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ७ जणाना संसर्ग झाल्याचा अहवाल आला आहे. तर, १५ मार्च रोजी ५६ जणांची चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल मंगळवारी दुपारी प्राप्त झाला असून त्यामध्ये १२ जणांना करोना संसर्ग झाल्याचा अहवाल आला आहे.
https://ift.tt/3rWFimy