
नवी दिल्लीः मुंबईत मुकेश अंबानींच्या घराजवळ कारमध्ये सापडलेली स्फोटकं आणि त्यानंतर मनसुक हिरण यांची झालेली हत्या आणि पोलीस अधिकारी सचिन वाझेंच्या प्रकरणावरून मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची झालेली बदली आणि त्यांच्या पत्रामुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील हे दिल्लीला जाणार आहेत. यामुळे राष्ट्रवादीच्या दिल्लीत होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अनिल देशमुखांवरील आरोप पाटील यांनी फेटाळले दरम्यान, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केले आरोप फेटाळून लावले आहेत. परमबीर सिंग यांचे आरोप हे कुणालातरी खुश करणाच्या उद्देशाने अधिक वाटत असल्याचं जयंत पाटील म्हणाले. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र हे त्यांची बदली झाल्याची प्रतिक्रिया आहे. सरकारने ठोस भूमिका घेतल्याने त्यांनी हे पत्र लिहिल्याचं दिसून येतंय. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.