जमावबंदी झुगारून सरपंचाच्या निवडीचा जल्लोष; पोलीस बघत बसले! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, April 9, 2021

जमावबंदी झुगारून सरपंचाच्या निवडीचा जल्लोष; पोलीस बघत बसले!

https://ift.tt/3dTiq1A
हर्षदा सोनोने । अकोला जिल्ह्यातल्या तालुक्यातील आलेगाव येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड गुरुवारी करण्यात आली. या निवडीनंतर सरपंच समर्थकांनी गावात मिरवणूक काढून जोरदार जल्लोष केला. या मिरवणुकीमुळे प्रतिबंधक नियमांची ऐशीतैशी झाली. विशेष म्हणजे, हा सगळा प्रकार चान्नी पोलीस ठाणेदाराच्या साक्षीने घडला. तरीही कोणतीही कारवाई झाली नाही किंवा कुणालाही थांबविण्यात आले नाही. वाचा: अकोला जिल्ह्यात १६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागेसाठी आज निवडणूक झाली. यात आलेगाव ग्रामपंचायतीचाही समावेश होता. येथील निवडणुकीनंतर नवनिर्वाचित सरपंच व समर्थकांनी गावातून वाजतगाजत भव्य मिरवणूक काढली. मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांपैकी कोणीही मास्क लावलेले नव्हते. सामाजिक अंतराचा नियमही पायदळी तुडविण्यात आला. चान्नी पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराच्या साक्षीने हा जल्लोष झाला आणि करोना प्रतिबंधक नियमांची पायमल्ली केली. मात्र, ठाणेदारांनी कुणालाही अडवले नाही किंवा करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून आनंद साजरा करा, अशी साधी तंबीही दिली नाही. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. त्यांनी तुफान जल्लोष केला. या सगळ्या प्रकारातून गावात करोनाचा प्रसार झाल्यास त्याला जबाबदार कोण? अशा बेजबाबदारपणामुळे करोनाचा प्रसार झाल्यास नवनिर्वाचित सरपंच जबाबदार राहणार?, त्यांचे कार्यकर्ते जबाबदारी घेणार की मूकपणे सर्व प्रकार पाहून या प्रकाराला अप्रत्यक्ष समर्थन देणारे पोलीस जबाबदार राहणार? असा प्रश्न गावातील सुज्ञ नागरिक विचारत आहेत. जिल्हा प्रशासन या सगळ्या प्रकारावर काय कारवाई करते, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे.