मुंबईत रात्रीपासून जोरदार पाऊस; पुढील तीन तासांत मुसळधार पावसाचा इशारा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, June 12, 2021

मुंबईत रात्रीपासून जोरदार पाऊस; पुढील तीन तासांत मुसळधार पावसाचा इशारा

https://ift.tt/3wksrg1
मुंबईः गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसानं मुंबईला झोडपून काढल्यानंतर आजही पावसाची संततधार सुरुच आहे. मुंबई व उपनगरात काल रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरु असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. पुढील तीन तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा तर काही ठिकाणी अतितीव्र पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईला रविवारी आणि सोमवारी हवामान खात्यानं रेड अलर्टचा इशारा दिला आहे. मात्र, त्याआधीच मुंबईला पावसानं झोडपून काढलं आहे. रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळं अंधेरीतील सबवेमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तर, सायन परिसरात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पाणी साचल्यामुळं वाहनांना पाण्यातून वाट काढण्यास अडचण निर्माण होत आहे. मुंबईबरोबर पश्चिम उपनगरातील वसई, विरार, नालासोपारा परिसरातही काल रात्रीपासून पाऊस बरसत आहे. नालासोपारा, वसई भागातील काही भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई व उपनगरात येत्या काही तासांत पावसाचा जोर वाढेल असा, अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसंच, येत्या ४८ तासांत अतितीव्र पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, आज पावसाची तीव्रता वाढून मध्य महाराष्ट्रातील घाट भागांमध्ये तसेच, विदर्भाच्या काही भागांमध्येही पावसाची तीव्रता वाढू शकेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या पश्चिमेकडील प्रवासाच्या पार्श्वभूमीवर रविवारी मुंबई, ठाणे यासह रायगड, रत्नागिरीला रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. या काळात पश्चिम किनारपट्टीवर अतितीव्र मुसळधार पाऊस पडू शकेल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. रायगड आणि रत्नागिरीला शनिवारी आणि रविवार या दोन्ही दिवशी रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. या ४ ते ५ दिवसांमध्ये पावसाची तीव्रता रोज वाढू शकते. त्यामुळे गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, असे आवाहन हवामान विभागातर्फे करण्यात आले आहे.