प्रयागराजः केंद्रीय मंत्री यांनी आज उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील एका ऑक्सिजन प्लांटचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले. पण या कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरींची जीभ घसरली. 'करोनाच्या या संकटात अनेक नागरिकांना ऑक्सिजन अभावी आपला जीव गमवावा लागला, याचा मला आनंद आहे', असं नितीन गडकरी चुकून बोलून गेले. पण नितीन गडकरींना आपल्या चुकीची जाणीव होताच त्यांनी ती सुधारली. हवेतून ऑक्सिजन निर्मितीची ही यंत्रणा आहे. करोनाच्या या संकटात काही रुग्णांना ३ ते ४ लिटर तर काहींना २० लिटर ऑक्सिजनची गरज भासते, याचा अनुभव आला. यामुळे सर्व जिल्ह्यांनी ऑक्सिजन पुरवठ्याच्या मुद्द्यावर स्वावलंबी झालं पाहिजे, असं गडकरी म्हणाले. आपण आता जियोलाइन ३५० टन रशियातून आयात केले आहे. पुढे जाऊन आपल्याला यात स्वावलंबी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रस्ते बांधी करण्याऱ्या कंत्राटदारांनी नैनीमध्ये ऑक्सिजन प्लांट लावण्याचा विचार केला. हे समाजासाठी हिताचं आहे, असं गडकरींनी सांगितलं. या कार्यक्रमाला यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, सिद्धार्थनाथ सिंह आणि महेंद्र नाथ सिंह हे उपस्थित होते. दैनिक भास्करने हे वृत्त दिलं आहे. '५० बेडच्या हॉस्पिटल्ससाठी ऑक्सिजन प्लांटची सक्ती हवी' केशव प्रसाद मौर्य, सिद्धार्थनाथ सिंह आणि महेंद्र सिंह यांच्याशी आपण चर्चा केली. उत्तर प्रदेशातील ५० बेड असलेल्या सर्व हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन प्लांट सक्तीचे करण्याची गरज आहे. सरकार यावर लवकरच नियम आणेल. आता ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरचे उत्पादन देशातच होत आहे. ४ जणांना एकाच सिलिंडरद्वारे ऑक्सिजन दिला जात आहे. आम्ही महाराष्ट्रात अतिशय स्वस्तात ते खरेदी केले आहेत. यासाठी ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरची बँकही उघडली आहे. यामुळे कुणाचाही मृत्यू होणार नाही. बायपॅकही २५०० खरेदी केले आहेत, असं गडकरी म्हणाले. देशात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा होता. आता आपण स्वावलंबी झालो आहोत. उत्तर प्रदेशला हवे असल्यास ते मागवू शकतात. १२५० रुपयात काळ्या बुरशीचे (ब्लॅक फंगस) इंजेक्शनही तयार केले आहे. यूपीला महाराष्ट्रातून घेता येईल, असं गडकरींनी सांगितलं. 'आम्ही काम केलं, फोटो काढणं बंद केलं' करोनाच्या या संकटात आम्ही फक्त काम केलं. प्रचारासाठी फोटो काढणं बंद करण्यात आलं. महाराष्ट्रात ९० कोटींच्या साहित्याचं वाटप करण्यात आलं. ५०० व्हेटिलेटर्स वाटले तेही मोफत. आम्ही फोटोही काढले नाही. आपल्याला जाती, धर्माच्या पलिकडे जाऊन काम केले पाहिजे, असं आवाहन नितीन गडकरींनी यावेळी केलं.