खेळलो, बागडलो त्या गावाला स्मशानकळा; तळीयेतील ग्रामस्थांची आपबिती - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, July 26, 2021

खेळलो, बागडलो त्या गावाला स्मशानकळा; तळीयेतील ग्रामस्थांची आपबिती

https://ift.tt/3eTlmwe
‌म. टा. विशेष प्रतिनिधी, ज्या गावातील अंगणामध्ये खेळलो-बागडलो, शेतीत लावणी-पेरणीची कामे केली, मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये गप्पांचे फड रंगवले, त्या गावाला आता स्मशानकळा आली आहे. ग्रामस्थांचे दरडीखाली सापडलेले मृतदेह चिखलराड्यातून बाहेर काढताना पोटात खड्डा पडत होता. हात थरथरत होते. डोळ्यातले पाणी थांबत नव्हते, अशा हृदय हेलावून टाकणाऱ्या भावना ठाण्याच्या आनंदनगर येथून तळिये ग्रामस्थांच्या मदतीसाठी धावलेल्या तरुणांनी व्यक्त केल्या. आनंदनगरमधील हे ३० तरुण रविवारी सकाळी पुन्हा ठाण्यात परतले. तेथील परिस्थिती पाहून हे सगळे जण सुन्न झाले आहेत. 'काय सांगायचे आता, सांगण्यासारखी परिस्थिती राहिली नाही, असे त्यांनी हताशपणे सांगितले. दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतली नसल्याने तळिये गावामध्ये सगळा चिखल आणि दलदल साचून राहिली आहे. त्या चिखलात मृतदेह शोधून काढण्यासाठी मदतीसाठी गेलेल्या यंत्रणांसोबत या ठाणेकर तरुणांनाही प्रयत्नांची शिकस्त करावी लागली. चिखल किती आहे याचा अंदाज येत नव्हता, त्यामुळे एकमेकांना आधार देत हे मदतकार्य केल्याचे हे तरुण सांगतात. पोस्टविभागातून निवृत्त झालेले ६० वर्षीय नारायण पोळ यांनीही तळियेकडे धाव घेतली. बाळकृष्ण यादव, राजेश यादव, गणेश पांडे, सचिन शेडगे, रवींद्र पवार, विठ्ठल पवार, दत्ताराम निकम, तुळशीराम पोळ यांनी मदतकार्यामध्ये मोठी जबाबदारी पेलली. कळवा येथे राहणारे ग्रामस्थ तुळशीराम पोळ यांनी गावाला स्मशानकळा आल्याचे सांगितले, ज्या गावकऱ्यांनी एकत्रितरित्या सणसमारंभ, देवीचा उत्सव साजरा केला त्या वाडीतून ग्रामस्थांचे मृतदेह काढताना तरुण मुले ढसढसा रडत होती. पावसाची तमा न बाळगता त्यांनी हे काम केले. उरल्या फक्त भिंती संध्याकाळी उशिरापर्यंत वाडीमध्ये मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते. मात्र, चिखल आणि पावसामुळे पुढे जाणे शक्य होत नव्हते. मृतदेह कुजल्यामुळे दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे संध्याकाळनंतर हे काम कसे करायचे हा प्रश्न स्थानिकांसह मदतीसाठी गेलेल्या यंत्रणेपुढेही होता. हसत्या-खेळत्या गावाची दुर्दशा पाहून या इतर गावामध्येही धास्तीचे वातावरण होते. तळीये गावातील खालच्या वाडीमध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांच्या मनामध्येही भीती आहे, असे कमलेश पाटील सांगतात. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या गावांकडे हिरवी गावे म्हणून पाहिले जायचे. त्याच गावात स्वतःच्या घरात रात्री राहायलाही गावकऱ्यांना धास्ती वाटत होती. त्यामुळे त्यांना शेजारच्या सुतारवाडीमध्ये हलवण्यात आले. म्हाडा घरे बांधून देणार, अशी घोषणा करण्यात आली असली, तरीही जिथे कुटुंबेच राहिली नाहीत, तिथे सिमेंटच्या घरामध्ये कोण राहणार, हा अव्यक्त प्रश्न येथील प्रत्येकाच्या मनाला छळत होता. वीज, पाण्यासाठी विनवणी महाड आणि नजीकच्या पूरग्रस्त गावांमध्ये वीज आणि पाणी नसल्यामुळे तिथल्या रहिवाशांचे हाल झाले. जेवण, अन्नधान्य, गरम कपडे, औषधे यांची मदत मिळाली असली, तरीही पाणी आणि विजेसाठी लोक सातत्याने विचारणा करत होते.