कोल्हापूरः करोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटनं (delta plus variant) डोकं वर काढलं आहे. मुंबई, ठाण्यासह आता कोल्हापूरमध्येही डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आढळल्यानं खळबळ उडाली आहे. तर, आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात करोना संसर्गाचा कहर कमी होत असतानाच आता डेल्टा प्लसचा विळखा बसत असल्याचे स्पष्ट होत आहे. एकाच दिवशी सहा जणांचा अहवाल आला असून या सर्वांमध्ये डेल्टा प्लसचे विषाणू आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, हे सर्व रूग्ण बरे होवून घरी परतल्यानंतर हा अहवाल आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार महिन्यात करोनाचा विळखा घट्ट होता. रोज हजार ते दीड हजार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह येत होता. याशिवाय करोनामुळे रोज वीस ते तीस जणांचा बळी जात होता. राज्यातील अनेक शहरात करोना संसर्ग कमी होत असताना कोल्हापूरात मात्र तो कमी होत नसल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह टास्क फोर्स व केंद्रिय समितीने कोल्हापूरला भेट देवून पाहणी केली. या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसात करोनाचा कहर काही प्रमाणात कमी होत आहे. तरीही रोज चारशेपेक्षा अधिक जणांचा अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. त्यामुळे काही प्रमाणात भीती कायम आहे. अशातच डेल्टा प्लसने डोके वर काढल्याने भीती वाढली आहे. गेल्या आठवड्यात एका महिलेला डेल्टा प्लस विषाणूची लागण झाल्याचा अहवाल आला होता. मे महिन्यात तिला करोना झाला होता. त्यानंतर तब्बल अडीच महिन्यानंतर तिचा अहवाल आला. पण तोपर्यंत बरी झाली होती. तरीही प्रशासनाची धावपळ उडाली होती. ति ज्या भागात राहते, त्या भागात महापालिका अधिकाऱ्यांनी भेट देवून विविध उपाययोजना सुरू केल्या. वाचाः ही घटना ताजी असतानाच रविवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील सहा करोनाबाधित रूग्णांच्या शरीरात डेल्टा प्लसचे विषाणू असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये कोल्हापूर शहरात तीन, हातकणंगले तालुक्यात दोन तर करवीर तालुक्यातील एका रूग्णाचा समावेश आहे. शहरात सापडलेला एक रूग्ण विचारे माळ तर दोन रूग्ण साने गुरूजी वसाहत परिसरातील आहेत. विशेष म्हणजे त्यांचा अहवाल रविवारी आला असला तरी हे सर्व रूग्ण यापूर्वीच बरे झालेले आहेत. त्यामुळे कोणीही घाबरून जावू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ज्या भागात डेल्टा प्लसचे रूग्ण सापडले आहेत, त्या भागात तातडीने नागरिकांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिका, जिल्हा परिषदेसह आरोग्य विभागाची यंत्रणा गतीमान झाली आहे. वाचाः वाचाः