नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये येत्या काही महिन्यात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. सध्या कसोटी, वनडे आणि टी-२० साठी एकच कर्णधार आहे. पण काही दिवसात हे चित्र बदलू शकते. हा एकमेव कर्णधार असणार नाही. वेगवेगळ्या फॉर्मेटसाठी वेगवेगळे कर्णधार यावर गंभीरपणे विचार सुरू आहे. असे झाले तर रोहित शर्माकडे वनडे आणि टी-२०चे नेतृत्व दिले जाऊ शकते. जर किंग विराटकडे फक्त कसोटीचे कर्णधारपद सोपवले जाईल. वाचा- भारतीय क्रिकेट संघाला तिनही प्रकारात नेतृत्व देणारा ३२ वर्षीय विराट कोहली हा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. पण लवकरच सोबत त्याला जबाबदारी वाटून घ्यावी लागू शकते. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपनंतर याचा निर्णय होऊ शकतो. टाइम्स ऑफ इंडियाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. वाचा- ऑस्ट्रेलियात मिळालेल्या विजयानंतर वातावरण तयार झाले.... विराट कोहलीने गेल्या काही महिन्यात रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनासोबत या मुद्यावर चर्चा केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना विराट कोहली मुलीच्या जन्मासाठी भारतात परतला होता. तेव्हा त्याच्या गैरहजेरीत भारताने ऐतिहासिक कसोटी मालिका विजय मिळवला होता. त्यानंतर प्रसार माध्यमे आणि सोशल मीडियावर वातावरण निर्मिती झाली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील बीसीसीआयने देखील यासाठी जोरदार तयारी केली आहे. वाचा- विराटच्या फलंदाजीवर होतोय परिणाम तिनही फॉर्मेटमध्ये नेतृत्व करणाऱ्या विराटवर दबाव वाढत चालला आहे. याचा परिणाम त्याच्या फलंदाजीवर होत आहे. आकडेवारीवर नजर टाकल्यास ही गोष्ट अधिक स्पष्ट होते. भारताला २०२२ आणि २०२३ मध्ये दोन वर्ल्डकप खेळायचे आहेत. त्यामुळे ही गोष्ट अधिक गरजेची ठरते. वनडे आणि टी-२० मध्ये विराटच्या विजयाची टक्केवारी ७०.४३ आणि ६७.४४ अशी आहे. पण यातील अधिक सामन्यात धोनी त्याच्या सोबत होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिनही फॉर्मेटमधील कर्णधारपदाच्या जबाबदारीमुळे फलंदाजीवर परिणाम होत असल्याचे विराटला जाणवत आहे. जबाबदारी त्याच्या फलंदाजीवर वरचढ ठरत आहे. त्याला थोडी मोकळीक आणि फ्रेशनेसची गरज आहे, विराट अद्याप संघासाठी खुप काही योगदान देऊ शकतो. जर रोहितने वनडे आणि टी-२०चे नेतृत्व केले तर विराट कसोटीमध्ये कर्णधारपद संभाळू शकले. विराट फक्त ३२ वर्षाचा असून त्याचा फिटनेस पाहता तो कमीत कमी ६ वर्ष क्रिकेट खेळू शकतो. टाइम्स ऑफ इंडियाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित शर्माने ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. तसेच टी-२० मधील कर्णधार म्हणून त्याचे रेकॉर्ड शानदार आहे. हीच योग्य वेळ आहे जेव्हा रोहित आणि विराट यांची जबाबदारी वाटून दिली जाऊ शकते. याचा फायदा भारतीय संघाला देखील होऊ शकतो. या दोन्ही खेळाडूंचे ट्यूनिंग देखील चांगले आहे.