एसी लोकलबाबत प्रवाशांची नाराजी; 'हे' आहे कारण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 24, 2021

एसी लोकलबाबत प्रवाशांची नाराजी; 'हे' आहे कारण

https://ift.tt/3nEXUqn
म. टा. प्रतिनिधी, निर्बंध शिथील झाल्याने रेल्वे प्रवासासाठी पुन्हा गर्दी होऊ लागली आहे. अशावेळी वातानुकूलित महागडी लोकल प्रवाशांच्या माथी मारण्याचा घाट दिल्लीस्थित रेल्वे अधिकाऱ्यांकडून घातला जात असल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे. मागील तीन महिन्यांत ३७पैकी २४ रेल्वे स्थानकांत ५०पेक्षा कमी वातानुकूलित लोकलपासची विक्री झाली आहे. त्यामुळे अशा अल्प प्रतिसादाच्या लोकलऐवजी सामान्य लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सातत्याने वाढणाऱ्या इंधनदरामुळे दैनंदिन वस्तू महाग झाल्या आहेत. यामुळे घरखर्च चालवताना सामान्य कुटुंबीयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशातच प्रथम श्रेणीच्या तिकीट दरापेक्षाही वातानुकूलित लोकलच्या तिकिटाचा दर जास्त आहे. राज्य सरकारकडून गर्दी करू नका, असे आवाहन करण्यात येत असले तरी अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने सामान्य मुंबईकरांचा प्रवास साध्या लोकलमधील गर्दीतूनच होत आहे. १ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबरदरम्यान वातानुकूलित लोकलचे एकूण चार हजार २४० पास विकले गेले. यापैकी बोरिवली स्थानकातून सर्वाधिक एक हजार १०८ पासची विक्री झाली. त्यापाठोपाठ मालाड (३०९), कांदिवली (२८९), भाईंदर (२८९), वसई रोड (३०१) या स्थानकांचा क्रमांक लागतो. पश्चिम रेल्वेतील मुंबई रेल्वेत ३७ स्थानके आहेत. त्यापैकी २४ स्थानकांत ५० पेक्षा कमी वातानुकूलित पासची विक्री झाली आहे. अन्यथा तिकीट दर कमी करा वातानुकूलित लोकलच्या मासिक पासचे दर हे प्रथम श्रेणीपेक्षा जास्त आहेत. त्याचबरोबर वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या मर्यादित आहेत. परिणामी दोन वातानुकूलित लोकलमध्ये बरेच अंतर आहे. या कारणांमुळे वातानुकूलित लोकलला अद्याप हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे या लोकलचे दर कमी करून फेऱ्या वाढवण्यात याव्यात, अशी मागणी सामान्य रेल्वे प्रवाशांकडून करण्यात येत आहे.