: सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची एकरकमी २ हजार ९६० रुपये देणार असल्याची घोषणा कारखान्याचे संस्थापक आणि ग्रामविकास मंत्री यांनी केली आहे. तसंच कारखान्याच्या कामगारांना येत्या एक जानेवारीपासून वेजबोर्डही लागू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. कारखान्याच्या सातव्या गळीत हंगाम शुभारंभात मंत्री हसन मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी बिद्री कारखान्याचे संचालक गणपतराव फराकटे होते. भाषणात मंत्री हसन मुश्रीफ पुढे म्हणाले की, एकरकमी एफआरपी देणे ही शेतकऱ्यावर मेहरबानी नव्हे तर आमचे आद्य कर्तव्यच आहे. त्यामुळे, कोणीही टिमकी वाजवण्याची गरज नाही. आंबेओहळ प्रकल्प पूर्ण झाला आहे. लवकरच नागणवाडी प्रकल्पही पूर्ण होईल. त्यानंतर कारखाना कार्यक्षेत्रातच हक्काचा ऊस पिकेल. त्यामुळे, येत्या एक-दोन वर्षातच गाळप क्षमता दहा हजार टन, पन्नास मेगावॅट वीजनिर्मिती व दररोज एक लाख लिटर इथेनॉल निर्मिती अशी विस्तार वाढ करणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, या हंगामात नऊ लाख टन ऊस गाळपासह ११ कोटी युनिट वीजनिर्मिती, सव्वा कोटी लिटर इथेनॉल व ५० लाख लीटर रेक्टिफाईड स्पिरिट अशी उद्दिष्टे असल्याचंही हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.