
सातारा: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या () निमित्तानं जिल्ह्यात राजकारण चांगलंच रंगलं आहे. बँकेवर वर्चस्व राखण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी दंड थोपटले आहेत. आमदार व खासदार () यांच्यातही कलगीतुरा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. 'सातारा जिल्ह्यातील निर्णय जिल्ह्यातच झाले पाहिजेत,' असं त्यांनी ठणकावलं आहे. त्यांचा रोख राष्ट्रवादीकडं असल्याचं बोललं जात आहे. सातारा नगरपरिषदेच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमाच्या प्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. 'बँकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कुठंतरी बैठक बोलावली आहे. वास्तविक जे मतदार तुम्हाला मत देणार आहेत, देत आले आहेत, त्यांची मतं आजमावण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेसारखी बैठक बोलवली असती तर ते संयुक्तिक ठरले असते. ज्यांनी सहकारी संस्था मोडकळीस आणल्या, संस्थांचे खाजगीकरण केले, अशा व्यक्तींना जिल्हा बँकेच्या मतदारांनीच बँकेपासून दूर ठेवणं गरजेचं आहे,' असं उदयनराजे म्हणाले. 'आजवर नको ते लोक निवडून आल्यामुळं सहकारी संस्था मोडकळीस आल्या. काही संस्था लिक्विडेशनमध्ये गेल्या, खासगीकरण झाले, काही जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँका सुद्धा दिवाळखोरीत गेल्याची उदाहरणे आहेत. जे लोक यासाठी कारणीभूत आहेत, त्यांना बँकेच्या व शेतकरी सभासदांच्या लोकहितासाठी बँकेपासून दूर ठेवणं आणि जिल्ह्याचे निर्णय जिल्ह्यातील व्यक्तींनी सार्वमत अजमावून घेणं आज गरजेचं आहे. परंतु माझं म्हणणं पचवता येणारं नसल्यानं पटणार नाही,' असा चिमटाही उदयनराजेंनी काढला. माझी इतकी मतं, माझी तितकी मतं, हा अहंकार आहे! 'माझी इतकी मतं आहेत, तितकी मतं आहेत, मीच पाहिजे, असा मीपणा हा अहंकार आहे. या अहंकारामुळं मतदारांना गृहित धरून राजकारण केलं जात आहे. सातारा जिल्हा सहकारी बँक पहिल्यापासून एक चांगली बँक आहे. लोकहिताचं काम चांगलं चाललेलं आहे. त्यास गालबोट लागता कामा नये,' अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.