
नवी दिल्लीः राष्ट्रीय रायफल्सच्या पहिल्या बटालियनमध्ये इंजीनिअर कॉर्प्समधील सॅपर प्रकाश जाधव यांचा मरणोत्तर किर्तीचक्राने गौरव करण्यात आला. हा शांतता काळातील दुसरा सर्वात मोठा पुरस्कार आहे. प्रकाश जाधव यांची पत्नी राणी प्रकाश आणि आई शारदा जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला. काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात २७ नोव्हेंबर २०१८ ला रेडबानी बाला गावात दहशतवादी लपून असल्याची माहिती मिळाली होती. यावेळी मोहीमेचे नेतृत्व करत असलेले प्रकाश जाधव हे घरात घुसले. त्यांना जिन्याने वर येताना पाहून दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. प्रकाश जाधव यांनी दहशतवाद्यांचा गोळीबार आपल्या अंगावर घेतला आणि सहकाऱ्यांना वाचवले. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना बाजूला ढकलले. यावेळी दहशतवाद्यांनी पेट्रोल बॉम्ब फेकला. प्रकाश जाधव यांनी सहकाऱ्यांना घराबाहेर जाण्यास सांगितले. त्यांनी दहशतवाद्यांना लक्ष्य केले. पण ते जखमी झाले होते.
जखमी असतानाही जाधव यांनी दुसऱ्या दहशतवाद्यालाही त्यांनी ठार केले. पण पेट्रोल बॉम्बमुळे घराला लागलेली आग भीषण झाली होती. त्यांनी आपले प्राण धोक्यात घालून आपल्या सहकाऱ्यांना घराबाहेर पाठवले होते. पण घराला लागलेल्या आगीमुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. भीषण आगीमुळे होरपळून ते शहीद झाले. 

