महावितरणने वीज तोडली अन् पीक करपू लागलं; शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 29, 2021

महावितरणने वीज तोडली अन् पीक करपू लागलं; शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या!

https://ift.tt/3lfu5fv
: शेतकऱ्यांकडून वीज बिल वसूल करण्यासाठी राज्यभरातील विविध ठिकाणी सरकारकडून वीज तोडणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सरकारच्या या कृतीमुळे अनेक ठिकाणी शेतकरी अडचणीत आला असून हातातोंडाशी आलेलं पीक डोळ्यादेखत करपून जात आहे. बीडमधील एका शेतकऱ्याच्या बाबतीतही असाच काहीसा प्रकार घडला आणि या शेतकऱ्याने आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे. () कृष्णा राजाभाऊ गायके (वय 23 रा. निपाणी जवळका, ता. गेवराई, जि.बीड) असं आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. कृष्णा गायके यांनी आपल्या शेतात कांदा गोट लागवडीसाठी बियाणे आणले होते. परंतु वीज तोडणी करण्यात आल्याने सदरील बियाणे खराब होऊ लागले होते आणि शेतातील पिकेही करपू लागली होती. यामुळे ओढावणाऱ्या संभाव्य आर्थिक संकटामुळे या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस अधिकारी शेळके हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सदर शेतकऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी निपाणी जवळका प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून वीज तोडणी करण्याऱ्या महावितरणच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.