
नवी दिल्लीः लोकसभेच्या तीन जागा आणि विधानसभेच्या एकूण २९ जागांवरील पोटनिवडणुकीचे निकाल लागले. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचा प्रत्येक विजय हा कार्यकर्त्याचा विजय आहे, असं राहुल गांधी म्हणाले. हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसचा मोठा विजय झाला आहे. राजस्थानमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीत धारियावाड आणि वल्लभनगर या दोन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या. काँग्रेसने आपली एका जागा राखली, तर भाजपच्या जागेवर विजय मिळवला. राजस्थानमधील गहलोत सरकार पुढील तीन महिन्यात आपला तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत आहे. हिमचाल प्रदेशातही काँग्रेसने सत्ताधारी भाजपला झटका दिली आहे. फतेहपूर, अर्की आणि जुबल-कोटखई या विधानसभेच्या तीन जागांसह मंडी लोकसभा मतदारसंघातही विजय मिळवला. पोटनिवडणुकीसाठी ३० ऑक्टोबरला मतदान झालं होतं. काँग्रेसने फतेहपूर आणि अर्की या दोन जागा राखल्या. तर जुबल-कोटखई ही भाजपची जागाही जिंकली.