नवी दिल्लीः बाबरी मशिदीबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जेसिका लालची हत्या कोणी केली नाही, तसेच बाबरी मशीद कोणीही पाडली नाही, असं चिदम्बरम म्हणाले. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या सनराइज ओव्हर अयोध्या (Sunrise Over Ayodhya: Nationhood in Our Times) या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी चिदंबरम यांनी हे विधान केले. ६ डिसेंबर १९९२ ला जे काही घडले ते अत्यंत चुकीचे होते. या घटनेने आपल्या राज्यघटनेची बदनामी झाली. वर्षभरातच सर्व आरोपी निर्दोष सुटले. त्यामुळे जेसिकाला कोणी मारले नाही, तसे बाबरी मशीद कोणीही पाडली नाही. वेळ निघून गेल्यामुळे दोन्ही पक्षांनी ते (अयोध्या निकाल) मान्य केले. दोन्ही बाजूंनी ते मान्य केल्यामुळे तो योग्य निर्णय ठरला. पण दोन्ही पक्षांनी मान्य केलेला हा निर्णय योग्य नाही, असे चिदम्बरम बोलले. जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, एपीजे अब्दुल कलाम यांचा हा देश. आणि स्वातंत्र्याची ७५ वर्षे झाली. तरीही बाबरी मशीद कोणी पाडली नाही, हे सांगताना आपल्याला लाज वाटत नाही. हा निष्कर्ष आपल्याला कायम सतावत राहील, असे काँग्रेस चिदम्बरम म्हणाले. गांधीजी ज्या रामराज्याचा विचार करत होते ते रामराज्य आता राहिलेले नाही, जे अनेकांना समजले आहे. पंडित नेहरूंनी आपल्याला सांगितलेली धर्मनिरपेक्षता फार कमी लोकांना समजते, असेही पी. चिदम्बरम म्हणाले. दुसरीकडे, सलमान खुर्शीद यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे कौतुक केले. अयोध्या वादावरून समाजात फूट पडण्याची स्थिती होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने तोडगा काढला. कोर्टाच्या निर्णयाने खूप दूरवर पाहण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही हरलो, तुम्ही जिंकलात, असे या निर्णयातून वाटत नाही, असे खुर्शीद म्हणाले. ‘आम्ही जिंकलो’ अशी घोषणा केली जात नाही. पण कधी कधी असे संकेत दिले जातात. सर्वांना जोडण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. सध्या अयोध्येतील उत्सव पाहता हा एकाच पक्षाचा उत्सव असल्याचे दिसते, अशी टीका सलमान खुर्शीद यांनी भाजपवर केली.