नाशिक : तिसऱ्या लाटेमुळे महापालिका निवडणूक लांबणीवर पडणार?; उमेदवारांची धाकधूक वाढली - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, December 8, 2021

नाशिक : तिसऱ्या लाटेमुळे महापालिका निवडणूक लांबणीवर पडणार?; उमेदवारांची धाकधूक वाढली

https://ift.tt/3DscB5O
महेश महाले | नाशिक : दक्षिण आफ्रिकेत धुमाकूळ घातलेल्या आणि नंतर जगभरातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या करोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे आरोग्य यंत्रणांची डोकेदुखी वाढली आहे. राज्यातील सर्वच पालिका प्रशासन नवीन व्हेरिएंटचा शहरात संसर्ग होऊ नये, याकरिता बारीक लक्ष ठेऊन आहेत. नाशिक महानगरपालिकाही मागील आठवड्यापासून चांगलीच दक्षता घेत आहे. शहरात २८९ व्यक्ती परदेशातून आलेल्या आहेत. नव्या व्हेरिएंटमुळे महानगरपालिकेची येऊ घातलेली निवडणूक लांबण्याची शक्यता आता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या उमेदवारांची मात्र यामुळे धाकधूक वाढली आहे. () याआधीच तीन प्रभाग पद्धत रचना, ओबीसी आरक्षण आणि निवडणुकीसंदर्भात न्यायालयात दाखल केलेली याचिका अशा विविध कारणांमुळे पालिका निवडणूक लांबणीवर जाणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू होती. मात्र २९ नोव्हेंबर रोजी पालिका आयुक्तांनी प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा तयार करुन राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. त्यामुळे निवडणुका ठरलेल्या वेळेत होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र त्यातच करोनाच्या ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएंटमुळे आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. नाशिक शहरात अद्याप या विषाणूची लागण झालेला रुग्ण सापडला नसला तरी खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेची वैद्यकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अशा वातावरणात आगामी पालिका निवडणुका घेण्याचा धोका प्रशासन पत्करणार का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. नाशिक महानगरपालिकेची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपत असल्याने फेब्रुवारी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका होण्याची शक्यता सुरुवातीला वर्तवण्यात येत होती. मात्र पालिका निवडणूक मुदतीत होण्यास सुरुवातीपासूनच विविध अडचणी येत असल्याचं दिसत आहे. नवीन आलेल्या करोना विषाणूने जगभरातल्या आरोग्य संघटना चिंताग्रस्त आहे. भारतातही या विषाणूच्या प्रादुर्भावाचा धोका असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडू शकतात. दरम्यान, निवडणुका होणार की नाही, याबाबतचे नेमके चित्र पुढच्या काही दिवसांत स्पष्ट होईल. त्यामुळे प्रशासनाकडून निवडणुकांच्या संदर्भात काय निर्णय घेतला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.