औरंगाबाद : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या २४ तासात गंगापूर, वैजापूरमधील १६ मंडळात पाऊस झाला. तर गुरुवारी दिवसभर शहरात आणि ग्रामीण भागात काही ठिकाणी पावसाची रिपरिप झाली. शहरात २ मि.मी पाऊस पडल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली असून किमान तापमान १७.२ तर कमाल तापमान २१.२ अंश अंश सेल्सिअस एवढे होते. किमान तापमानात घट झाल्याने वातावरणात गारठा निर्माण झाला आहे. दरम्यान, पावसाची हजेरी व ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. किमान रब्बी हंगाम चांगला जाईल, झालेले नुकसान काही प्रमाणात भरुन निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच जिल्ह्यात तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणासह पावसानेही हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. बुधवारी वैजापूर, गंगापूर, पैठणसह औरंगाबाद तालुक्यात पावसाने हजेरी लावली. तर गुरुवारी पैठणच्या मुरमा, एमआयडीसी परिसरासह पाचोड, गंगापूर, लिंबेजळगाव, कचनेर, बिडकीन, देवगाव, बोरसर, ताडपिंपळगाव, सोयगाव, विहामांडवा आदी परिसरात पाऊस झाला असून अनेक भागात धुक्याची चादर दिसून आली. राज्यात इतरत्र ठिकाणी झालेल्या कालच्या पावसामुळे मोठं नुकसान झालं, त्यामुळे हिंगोली आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. एका पाठोपाठ येणारी अस्मानी आणि सुलतानी संकटाचा ची मालिका शेतकऱ्याना उद्ध्वस्त करून टाकत आहे. खरीप हंगाम हातचा निघून गेला, रब्बी हंगामाच्या तोंडावर वीज वितरण कंपनीने लाईट बंद केली, आणि आता अवकाळी पावसाचे आगमन होते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. कोकण विभाग आणि विदर्भातील तुरळक ठिकाणे वगळता किमान तापमानाचा पारा डिसेंबरच्या प्रत्येक ठिकाणच्या सरासरी किमान तापमानाच्या तुलनेत चढा आहे. विदर्भामध्ये बहुतांश ठिकाणी किमान तापमान १५ अंशांपेक्षा कमी नोंदवले गेल आहे. तर मराठवाड्यात १७ ते १९ अंशांदरम्यान आहे. मराठवाड्यातही सरासरीच्या तुलनेत पारा चढा आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये १५ ते २० अंशांदरम्यान किमान तापमानाचा पारा नोंदला गेला. राज्यातील पर्जन्यमान गुरुवारी सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये कोल्हापूर येथे ६९, महाबळेश्वर येथे ९२, मालेगाव येथे ५५, नाशिक येथे ६३.८, पुणे येथे ७५.४, सांगली येथे ५७.८ तर सातारा येथे ९२.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. डहाणूमध्ये २४ तासांत सर्वाधिक ११४.४ मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला.