करोना नाही तर 'या' आजाराने मुंबईकर चिंतेत, तुम्हालाही लक्षण दिसल्यास काळजी घ्या! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, April 24, 2022

करोना नाही तर 'या' आजाराने मुंबईकर चिंतेत, तुम्हालाही लक्षण दिसल्यास काळजी घ्या!

https://ift.tt/ie54KSc
मुंबई : मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने हिवताप नियंत्रणासाठी विशेष रक्तचाचणी मोहीम हाती घेतली आहे. २५ एप्रिल रोजीच्या 'जागतिक हिवताप दिना'निमित्त महिनाभर घरोघरी जाऊन ताप असणाऱ्यांची, तसेच बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांची रक्तचाचणी करण्यात येणार आहे. हिवतापासंबंधी कोणतीही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी रक्तचाचणी करून घ्यावी आणि योग्य औषधोपचार घ्यावेत, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. हिवताप हा डासांमुळे पसरणारा एक आजार असून, तो प्लास्मोडिअम नावाचा डास चावल्यामुळे होतो. ताप, डोकेदुखी आणि उलटीसारख्या लक्षणांमुळे त्याचे निदान होते. वेळेवर उपचार केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होतो. रोगनिदान आणि उपचारांमध्ये उशीर झाल्यामुळे मात्र गंभीर गुंतागुंत होऊ शकते. त्यात रुग्ण दगावण्याची शक्यता जास्त असते. म्हणून ताप आल्यावर वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय व रक्तचाचणी करून हिवतापाचा प्रकार समजल्याशिवाय औषधे घेऊ नयेत. योग्य निदानासाठी व वेळेत उपचारासाठी त्वरित रक्तचाचणी करणे आवश्यक असल्याचे पालिकेने म्हटले आहे. पालिकेने जानेवारी २०२२पासून तीन लाख ४० हजार ५१५ रक्तनमुन्यांची चाचणी केली आहे. पालिकेच्या १९० दवाखान्यांमध्येही ताप आलेल्या रुग्णांची रक्तचाचणी केली जात आहे. तापाच्या प्रकारानुसार उपचार हिवताप कोणत्या प्रकाराचा आहे, त्यानुसार उपचार केले जातात. भारतामध्ये प्रामुख्याने वायवॅक्स मलेरिया हा प्रकार अधिक आढळतो. याच्या उपचारासाठी डॉक्टरांकडून क्लोरोक्विनच्या गोळ्यांचा डोस तीन दिवस दिला जातो. त्यानंतर यकृतामधून प्लाज्मोडियम परजीवी समूळ नाहीसे करण्यासाठी प्रायमाक्यवीन गोळीचा डोस १४ दिवस देण्यात येतो. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर नियमितपणे घेणे आवश्यक असते, असे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.