करोना संसर्गात रुग्ण वाढले, तरी परिचारिकांची संख्या मात्र अल्पच - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, May 12, 2022

करोना संसर्गात रुग्ण वाढले, तरी परिचारिकांची संख्या मात्र अल्पच

https://ift.tt/LUpuBbm
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : करोना संसर्गाच्या काळात रुग्णसंख्या वाढली असली, तरीही परिचारिकांची संख्या मात्र अद्याप वाढलेली नाही. रुग्णालये, तसेच करोना उपचार केंद्रांमध्ये रुग्णसेवा देण्यासाठी पालिकेने कंत्राटी पद्धतीने परिचारिकांची भरती केली. मात्र, करोना संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर त्यांना पुन्हा घरी पाठवण्यात आले. करोनाव्यतिरिक्त रुग्णसेवेचा भार पुन्हा वाढला असताना, रुग्णसंख्या व परिचारिकांची संख्या यांचे गणित आजही व्यस्त आहे. मागील अनेक वर्षांपासून भेडसावणारा हा प्रश्न केव्हा सुटणार, असा प्रश्न सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या परिचारिकांनी उपस्थित केला आहे. परिचारिकांच्या वैद्यकीय सेवेचे कौतुक केले जाते. प्रत्यक्षात रिक्त जागा भरण्याचा प्रश्न येतो, तेव्हा मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून वैद्यकीय सेवा देणाऱ्या परिचारिकांना घडवण्यासाठी उत्तम शिक्षक व तितक्याच गुणवत्तेच्या महाविद्यालयांचीही गरज आहे. करोना व्यवस्थापनामध्ये या घटकांचा विचार शेवटी करण्यात आला आहे. ग्रामीण भागामध्ये परिचारिकांची सेवा देण्यासाठी आज मुली पुढे येत नाहीत. कामाचे तास, वाढता ताण, रुग्णभार वाढता असल्याने कुटुंबासाठी मिळणारा अपुरा वेळ अशा शेकडो प्रकारच्या अडचणी त्यांच्यापुढे असतात. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्याकडे यासंदर्भात विचारणा केली असता, रुग्णसंख्येच्या तुलनेत परिचारिकांची उपलब्धता हवी या मतास सहमती दर्शवली. सध्या असलेल्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेसंदर्भात अभ्यास करण्यात येईल, असेही ते म्हणाले. अनेक समस्या मुंबईमध्ये स्वतःचे घर घेणे ज्यांना शक्य होत नाही, त्या मुली वसई-विरारहून रुग्णालयामध्ये येतात. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर होतो. अनेक जणींचे संसार अर्धवट मोडतात, तर काही मुलांपासून दुरावतात. या परिस्थितीमध्ये रुग्णसेवा देणाऱ्या या परिचारिकांसाठी समुपदेशनासारख्या सेवांची नितांत गरज आहे. केरळ, तसेच परदेशातून पुन्हा भारताकडे येणाऱ्या परिचारिकांना पटकन नोकरी मिळते, तुलनेने पैसेही अधिक मिळतात. कंत्राटी, कायमस्वरूपी, मदतनीस म्हणून घेतल्या जाणाऱ्या अशा विविध पातळ्यांवर काम करणाऱ्या परिचारिकांना देण्यात येणारे वेतन हे वेगवेगळ्या स्वरूपाचे आहे. ही समस्या जागतिक जागतिक आरोग्य संघटनेच्या 'स्टेट ऑफ द वर्ल्डस नर्सिंग २०२०' या अहवालानुसार, जगभरातील परिचारिकांच्या तुटवड्यामुळे सर्वच देशांमधील रुग्णसेवेवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. कमी उत्पन्न असणाऱ्या देशांना हा तुटवडा अधिक जाणवला होता. येत्या काळामध्ये साथीचे आजार. हवामान बदल, वयोवृद्धांची वाढती संख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण येणार आहे. दरवर्षी किमान आठ टक्के तुटवडा भरून काढावा, अशी सूचना संघटनेने केली आहे.