Ranji Trophy Final : सर्फराझचे धडाकेबाज शतक, पण तरीही मुंबईचा संघ अडचणीत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, June 24, 2022

Ranji Trophy Final : सर्फराझचे धडाकेबाज शतक, पण तरीही मुंबईचा संघ अडचणीत

https://ift.tt/r6oAhyp
बेंगळुरू : सर्फराज खान पुन्हा मुंबईच्या मदतीस धावून आला. त्याने गुरुवारी मोसमातील चौथे शतक करून मुंबईला ६ बाद २४८ वरून ३७४ पर्यंत नेले. अर्थात मध्य प्रदेशने मुंबईला रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत आव्हान सोपे नाही याची जाणीव करून दिली. मध्य प्रदेशने दुसऱ्या दिवसअखेर १ बाद १२३ धावा करीत मुंबईवरील दडपण वाढवण्यास सुरुवात केली आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर दिवसातील पहिल्याच षटकांत यश मिळवलेल्या मध्य प्रदेश मुंबईला २७५च्या आसपास रोखण्याचे लक्ष्य बाळगून होते; पण सर्फराजने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवले. मात्र, मध्य प्रदेशने हार मानलेली नाही. त्यांच्या फलंदाजांनी खेळपट्टीवर उभे राहिल्यावर धावा होता, हे दाखवून दिले. यश दुबे आणि शुभम शर्माची नाबाद ७६ धावांची भागीदारी मुंबईवरील दडपण वाढवत आहे. दुसऱ्या दिवसाचा मानकरी निर्विवादपणे सर्फराज होता. त्याने या मोसमातील सहा सामन्यात ९३७ धावा केल्या आहेत. त्याहीपेक्षा त्याने काही वर्षांपूर्वी फटकेबाजीस पसंत देणारा सर्फराज आता परिपक्व फलंदाज झाला असल्याचे दाखवले. त्याने तळाच्या फलंदाजांसह धावा करताना सहकाऱ्यांभोवतीही क्षेत्ररक्षकांचे कडे नसेल याची काळजी घेतली. त्याचे प्रशिक्षक त्याला रोज ४०० चेंडू खेळण्यास भाग पाडतात. त्याचा परिणाम त्याच्या खेळात दिसत आहेत. त्याची खडूस फलंदाजी मध्य प्रदेशची डोकेदुखी ठरली. सर्फराजचे टायमिंग जबरदस्त होते. त्याचे चौकार रोखण्यासाठी सीमारेषेवरील क्षेत्ररक्षक वाढवण्यात आले, तरीही त्याचे चौकार थांबले नाहीत. सर्फराज ९७वर असताना नऊ क्षेत्ररक्षक सीमारेषेवर ठेवण्यात आले. तरीही त्याने गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू मारत चौकार वसूल केला. तो भारतीय संघाचा दरवाजा ठोठावत आहे, असे राहुल द्रविड का म्हणाले, हेच सर्फराजची फलंदाजी दाखवत होती. सर्फराज मुंबईचा बाद झालेला अखेरचा फलंदाज होता. त्यापूर्वी त्याने दुसऱ्या दिवशी तनुष कोटीयसनह (१५) सातव्या विकेटसाठी ४०, धवल कुलकर्णीसह (१) आठव्या विकेटसाठी २६, तुषार देशपांडेसह (६) नवव्या विकेटसाठी ३९ आणि मोहित अवस्थीसह (७) दहाव्या विकेटसाठी २१ धावांची भागिदारी केली होती. सर्फराजला फलंदाजीत साथ देणाऱ्या गोलंदाज मध्य प्रदेशच्या फलंदाजांवर दडपण आणण्यात अपयशी ठरले. तुषार देशपांडेनेच प्रभावी मारा केला. एकमेव यश त्यालाच मिळाले, मोहित अवस्थीने काही चेंडू रिव्हर्स स्विंग केले; पण त्यामुळे फलंदाज धास्तावले नाहीत. या मोसमात प्रभावी ठरलेल्या शम्स मुलाणीने फलंदाजांना क्वचितच चकवले, ही बाब मुंबई संघव्यवस्थापनास जास्त सलत असेल. स्कोअरबोर्ड ः मुंबई १२७.४ षटकांत ३७४ (पृथ्वी साव ४७, यशस्वी जयस्वाल ७८, सर्फराझ खान १३४ - २४३ चेंडूंत १३ चौकार आणि २ षटकार, कुमार कार्तिकेय ४१-६-१३३-१, अनुभव अगरवाल २९-५-८१-३, सारांश जैन २०-२-४७-२, गौरव यादव ३५.४-८-१०८-४) वि. मध्य प्रदेश ४१ षटकांत १ बाद १२३ (यश दुबे खेळत आहे ४४ - १३१ चेंडूंत ६ चौकार, हिमांशू मंत्री ३१ - ५० चेंडूंत ३ चौकार आणि २ षटकार, शुभम शर्मा खेळत आहे ४१ - ६५ चेंडूंत ६ चौकार, धवल कुलकर्णी ९-२-२२-०, तुषार देशपांडे १२-४-३१-१, शम्स मुलानी ११-०-४६-०, मोहित अवस्थी ७-३-११-०).