कोल्हापूर : राजकीय भूकंपाचा एक भाग म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे असलेली पक्षाची जबाबदारी कायम ठेवत मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्याबाबत हालचाली सुरू असल्याचे समजते. पण गेल्या सात वर्षात राज्यात विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी पक्षाचा केलेला विस्तार, महसूल, अर्थ, सहकार अशा महत्त्वाच्या खात्याचे यशस्वीपणे सांभाळलेले मंत्रिपद, मराठा आंदोलनासह अनेक प्रश्न हाताळताना त्यांनी दाखवलेले कौशल्य आणि मित्र पक्षांशी असलेले सौदार्हपूर्ण संबंध, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी लवकरच होत असलेल्या निवडणुका या पार्श्वभूमीवर त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी विविध पातळीवर मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांची सत्ता आल्यानंतर अचानक फडणवीस यांच्या ऐवजी शिंदे मुख्यमंत्री झाले. आपण सत्तेत सहभागी होणार नाही, आपल्याऐवजी चंद्रकांत पाटील यांना उपमुख्यमंत्री करावे अशी विनंती फडणवीस यांनी पक्षनेतृत्वाकडे केली होती. प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्याची तयारी त्यांनी दर्शविली होती. पण दोन तासात अचानक झालेल्या राजकीय घडामोडीतून फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्यानंर विधानसभा सभापती पदासाठी एखाद्या सीनियर आमदाराची निवड होईल अशी शक्यता वर्तवली जात असतानाच राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देऊन पक्षाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. या तीन राजकीय भूकंपाच्या पाठोपाठ मंत्रिमंडळ विस्तारातही अनेक धक्के देण्याच्या मनस्थितीत भाजपचे नेते असल्याचे समजते. याचाच एक भाग म्हणून पक्षातील काही बड्या नेत्यांना मंत्रिमंडळात सहभागी करून न घेता पक्षविस्ताराचे काम देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामध्ये चंद्रकांत पाटील यांचे नाव असल्याचे समजते. पण पक्षाच्या विस्तारासाठी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा यासाठी पक्षातूनच जोरदार पाठपुरावा केला जात आहे. आगामी काळात महानगरपालिका, लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद या सर्व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना प्रदेशाध्यक्षपदावर कायम ठेवून पक्ष विस्तारासाठी त्यांचा उपयोग करून घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. प्रदेशाध्यक्ष पद फडणवीस घेणार होते, त्यांनी तसे सुतोवाचही केले होते, पण अचानक त्यांना उपमुख्यमंत्री पद दिल्याने पाटील यांच्याकडील पद आता कायम राहणार आहे. पाटील यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी अतिशय जवळचे संबंध आहेत. त्यामुळे कदाचित त्यांनी आग्रह धरला तर मंत्रिमंडळात त्यांचा समावेश नक्की होऊ शकेल. पण पक्ष देईल ती जबाबदारी आपण घेऊ, आपण तर कोरे पाकीट आहे, पाकिटावर जे नाव लिहील तिथे आपण पोहोचू अशी भूमिका ते सातत्याने मांडत असतात. यामुळे आता पक्ष त्यांच्या पाकिटावर नवीन पत्ता म्हणून मंत्रिपद लिहिणार की प्रदेशाध्यक्ष पद कायम ठेवणार याची आता उत्सुकता वाढलेली आहे. पाटील यांच्याकडे यापूर्वी मंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्ष पद दोन्ही होते. पक्ष विस्तारासाठी प्रदेशाध्यक्षपदा बरोबरच मंत्रीपदाची ताकद असणे आवश्यक आहे. तसा विचार पक्षाने केल्यास त्यांचा मंत्रिमंडळात समावेश नक्की होऊ शकतो आणि दोन्हीही पदे त्यांना मिळू शकतात. मंत्रीपद मिळावे अशीच कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.
https://ift.tt/MBa2JUo