
रवी राऊत, यवतमाळ : दिग्रस मतदारसंघाच्या राजकारणात आतापर्यंत दोन 'संजय' महत्वाचे ठरले आहेत. संजय देशमुखांना मात देत सध्या संजय राठोड यांचे मतदारसंघात वर्चस्व आहे. मुळात हे दोघेही शिवसेनेतूनच पुढे आले आहे.दोघेही जिल्हाप्रमुख होते.मात्र पक्षाने संजय राठोड यांनी झुकते माप दिल्यानंतर संजय देशमुख अपक्ष लढले.आमदार संजय राठोड यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केल्याने दिग्रस मतदारसंघात त्यांना मात देण्यासाठी पुन्हा संजय देशमुख यांना पुढे आणण्याचा शिवसेनेचा प्लॅन आहे .२० ऑक्टोबरला संजय देशमुख 'मातोश्री'वर शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. संजय देशमुखांनी १९९९ ते २००९ असे १० वर्ष दिग्रस मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. विशेष म्हणजे दोन्हीवेळी त्यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला होता.मात्र,२००९ मध्ये संजय राठोड यांच्याकडून पराभवानंतर संजय देशमुख मतदारसंघाच्या राजकारणात मागे पडले. मात्र, दिग्रसमधील नगरपालिका, पंचायत समिती, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ अशा ठिकाणी प्रत्येकदा देशमुखांनी आपली ताकद दाखवली आहे.२०१९ मधील विधानसभा निवडणुकीत संजय देशमुखांनी संजय राठोडांच्या विरोधात अपक्ष लढत ७५ हजार मतदान घेतले होते. संजय देशमुखांच्या याच ताकदीला आता बळ देण्याचा विचार सेना नेतृत्वाने केला आहे. संजय देशमुखांचा राजकीय प्रवास... संजय देशमुख यांचा राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरू झाला. सन १९९८ मध्ये त्यांचा दिग्रस तालुक्यातील सिंगद-मांडवा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवारीवर पराभव झाला. पुढे सन १९९९ मध्ये ते शिवसेनेचे यवतमाळ जिल्हाप्रमुख झालेत. मात्र, विधानसभेचं तिकीट नाकारल्याने त्यांनी अपक्ष उभे राहत बंडखोरी केली, अन् फक्त १२५ मतांनी राष्ट्रवादीच्या ख्वाजा बेग यांचा पराभव केला. यावेळी विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे मंत्रीमंडळात क्रीडा खात्याचे देशमुख राज्यमंत्री बनलेत. २००४ मध्येही ते अपक्ष म्हणून विधानसभेवर निवडून आलेत. २००९ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर पुनर्रचित दिग्रसमधून निवडणूक लढविली होती मात्र, संजय राठोडांकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. २०१९ च्या लोकसभेपुर्वी त्यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला. मात्र, भाजप-सेनेच्या युतीमूळे तिकीट न मिळाल्याने त्यांनी संजय राठोडांविरोधात अपक्ष म्हणून बंडखोरी करीत तब्बल ७५ हजार मतं घेतलीत. दरम्यान, दिग्रसचे माजी आमदार राहिलेल्या संजय देशमुख यांना सेनेत घेत शिंदे गटात गेलेल्या दिग्रसचे आमदार आणि मंत्री संजय राठोडांना शह देण्याचा प्रयत्न सेना नेतृत्वाचा प्रयत्न आहे. संजय देशमुख यांचा तीन मतदारसंघात प्रभाव असल्यानं उद्धव ठाकरे गटाला मोठी ताकद मिळणार आहे.