'महाराष्ट्र टाइम्स'चा आजचा अग्रलेख : कडेलोटाच्या टोकावर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 19, 2022

'महाराष्ट्र टाइम्स'चा आजचा अग्रलेख : कडेलोटाच्या टोकावर

https://ift.tt/1HCKhX7
परतीच्या पावसाच्या जोरदार तडाख्याने पुण्याच्या एकूणच नगर नियोजनाची लक्तरे वेशीला टांगली आहेत. अपुऱ्या पायाभूत सुविधा, परिणामांची पर्वा न करता झालेले नियोजन, रस्त्यांची दर्जाहीन कामे आणि राज्यकर्त्यांची अक्षम्य बेपर्वाई यामुळे पुण्याची पुरती दुरवस्था झाली असून, या महानगराला कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. देशातील महत्त्वाचे शहर असलेले पुणे यंदाच्या पावसाळ्यात कडेलोटाच्या टोकावर येऊन ठेपले आहे. धडकी भरणारा पाऊस हे पुण्याचे वैशिष्ट्य कधीच नव्हते; मात्र गेल्या काही वर्षांपासून ते निर्माण झाले आहे. प्रामुख्याने सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये ढगांच्या गडगडाटासह काही तासांत अक्षरश: कोसळणाऱ्या पावसात अवघे शहर वाहून जाते की काय अशी भीती निर्माण होण्याचे प्रसंग पुण्यात गेल्या तीन-चार वर्षांत सातत्याने येत आहेत. सोमवारी रात्री पडलेला पाऊस याच प्रकारचा होता. रात्री नऊ नंतर सुरू झालेल्या या पावसाने प्रामुख्याने पुण्याच्या मध्य, दक्षिण आणि पूर्व भागांना जोरदार तडाखा दिला. बहुतेक रस्त्यांवर तळी साचली. त्यांपैकी काही ठिकाणी गुडघाभर पाणी साठले. सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. काही वाहने वाहून गेली. तीन वर्षांपूर्वी २५ सप्टेंबर रोजी पुण्यात पावसाने असाच रौद्रावतार धारण केला होता; त्यावेळी आंबिल ओढ्याला पूर आला होता. ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह दुर्लक्षित करून त्याला हवे तसे वळविल्याने आणि बांधकामे केल्याने हा पूर आला. त्याच्याही आधी अशाच पावसात पुण्यातील रामनदीला आणि नाल्यांना पूर आला होता. या आपत्तींतून योग्य धडा न घेतल्याने, मोठ्या पावसापासून पुण्याला असलेला धोका कायम आहे. वाहतुकीची कोंडी ही पुण्यासाठी नवीन बाब नाही; परंतु गेल्या काही दिवसांपासून पुण्यात होत असलेल्या वाहतूक खोळंब्यामुळे अवघ्या शहराचीच कोंडी झालेली आहे. आधीच वाहनांची संख्या सर्वाधिक असलेल्या या शहरात दरवर्षी दोनेक लाख वाहनांची नव्याने भर पडत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांच्या क्षेत्रांतील एकत्रित वाहनांची संख्या पन्नास लाखांहून अधिक आहे. इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या वाहनांसाठी या महानगरातील रस्ते अपुरे पडत आहेत की काय असा प्रश्न विचारला जातो आहे. मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील पूल पाडण्याच्या निमित्ताने सुरू झालेली वाहतूक कोंडी अजून संपलेली नाही. रोजचा पाऊस आणि सणासुदीचे दिवस असल्याने खरेदीसाठी होत असलेली गर्दी ही कारणे आहेतच; परंतु अकार्यक्षम आणि अपुरी सार्वजनिक वाहतूक सेवा हे त्याचे मुख्य कारण. या शिवाय स्मार्ट सिटीच्या नावाखाली रस्त्यांचा केलेला संकोच, काँक्रिटचे रस्ते, मेट्रो आणि अन्य विकासकामांना होत असलेला विलंब आणि बहुतेक सर्व रस्त्यांची झालेली चाळणी ही अन्य कारणेही आहेत. यामुळे पुण्याची होत असलेली कोंडी फोडण्यासाठी तातडीने पावले उचलून अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाय आखण्याची गरज आहे. पुण्यातील पायाभूत सुविधा वाढविण्याची आणि मुख्य म्हणजे सार्वजनिक वाहतूक सेवा भक्कम करण्यासाठी आग्रह धरण्याची आवश्यकता आहे. मात्र, परंतु शहराचे कर्तेधर्ते म्हणविणारे याबाबत आक्रमक होताना दिसत नाहीत. आपापले राजकीय गणिते जुळविण्यातच ते मग्न आहेत. त्यामुळे राज्याच्या शीर्ष नेतृत्वानेच यात जातीने लक्ष घालावे. पुण्याची ही दुरवस्था प्रातिनिधिक ठरावी, असेच चित्र सध्या आहे. परतीच्या पावसाचा तडाखा पुण्याबरोबरच राज्याच्या अनेक भागांना बसतो आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर; तसेच मराठवाडा आणि विदर्भात नागपूरसहित अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होतो आहे. यंदा राज्याच्या सर्व भागांत चांगला पाऊस झाल्याने बहुतेक महामार्ग आणि राज्यमार्गांची चाळण झाली आहे. शहरांमधील रस्त्यांची स्थिती तर अतिशय वाईट आहे. खड्ड्यांच्या रस्त्यांची सवय नागरिकांनी करून घेतली असली, तरी त्याचा फटका ते चुकवू शकत नाहीत; खड्ड्यांमुळे होणारे अपघात ते टाळू शकत नाहीत की आरोग्यावर होणारा विपरीत परिणामही रोखू शकत नाहीत. लांबलेल्या पावसाचा फटका शेतीलाही बसतो आहे. पाऊस काहीशा उशिराने सुरू होतो आणि ऑक्टोबरपर्यंत लांबतो असा अनुभव गेल्या काही वर्षांत येतो आहे. शिवाय, राज्यातील अनेक शहरांना पुराचाही विळखा बसतो आहे. हवामान बदलाचे हे सूचन आहे की नाही यावर शास्त्रज्ञांनी चर्चा करावी; परंतु अशा आपत्तींना सज्ज राहण्याची तयारी समाजाने आणि सरकारने करायला हवी. गेल्या काही वर्षांत प्रचिती येत असूनही तयारी करण्यात आपण कमी पडतो आहोत आणि म्हणूनच नुकसान वाढते आहे. आपत्कालीन नियोजनाबरोबरच शहरांमधील सुविधा वाढविण्याची आणि हवामान बदलाला अनुकूल असा बदल शेतीत करण्याची गरज आहे. तरच निसर्गाच्या तडाख्यात आपण वाचू शकू.