
परभणी : परभणी मध्ये मागील काही दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. मंगळवारी ११ ऑक्टोबर रोजी शेतामध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना दोरीच्या साह्याने पुराच्या पाण्यातून बाहेर काढावं लागलं. ही घटना परभणीच्या सेलू तालुक्यातील रायपूर येथे घडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा परभणी जिल्ह्यातील रस्ते आणि पुलांचे वास्तव समोर आले आहे. सेलू तालुक्यातील रायपूर या गावांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे गावाजवळून वाहणाऱ्या ओढ्याला पूर आला होता. त्यामुळे शेतामध्ये काम करण्यासाठी गेलेले शेतकरी शेतातच अडकले होते. मात्र, पावसाचा जोर वाढत असल्याने ओढ्याचे पाणीदेखील वाढत असल्याचे पाहून गावकऱ्यांनी ओढ्याच्या पलीकडे अडकलेल्या शेतकऱ्यांना गावांमध्ये सुखरूप परत आणण्यासाठी ओढ्यामध्ये दोरी बांधली. दोरीच्या सहाय्यानं शेतकऱ्यांना ओढ्यामध्ये दोरी बांधून पुराच्या पाण्यातून सुखरुप गावापर्यंत आणले. त्यामुळे पुन्हा एकदा परभणी मधील रस्ते आणि पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गावाला रस्ता नसल्यामुळे गावामध्ये कोणी मुलगी देत नसल्याची व्यथा एका व्यक्तीने काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर यांच्यासमोर मांडली होती. पालम तालुक्यातील लेंडी नदीला पूर आल्यानंतर अनेक गावांचा संपर्क तुटतो. यासोबतच गंगाखेड तालुक्यातील इंद्रायणी नदीच्या पुलाची उंची कमी असल्यामुळे पुलावर पाणी आल्यानंतर आठ गावांचा संपर्क तुटतो. या सर्व प्रकारामुळे परभणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या सर्व प्रकराकडे कधी लक्ष देणार हा प्रश्न निर्माण होत आहे. सदरील ओढ्यावर पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी आता रायपूर येथील ग्रामस्थांमधून केली जात आहे. बीडमध्ये मुसळधार पाऊस बीड जिल्ह्यात सकाळी दहा वाजल्यापासूनच मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट सुरू झाला होता. गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरल्याने अनेक पिकांचं नुकसान देखील झालं आहे. मात्र, यामध्ये बीडच्या वैभवात भर टाकणारा धबधबा म्हणजे कपिलधार सकाळपासून सतत पाऊस असल्याने ओसंडून वाहू लागला असल्याने हा धबधबा पाहण्यासाठी युवकांनी मोठी गर्दी केली आहे. मराठवाड्यात हिंगोलीमध्ये देखील पावसानं हजेरी लावली आहे.