
सोलापूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( ) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. सोलापूर येथील सकल मराठा समाजाचे प्रमुख समन्वयक माऊली पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांनी असे वादग्रस्त विधान करायला नको होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची हकालपट्टी करावी, अशी आक्रमक भूमिका सकल मराठा समाजाने मांडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज ( ) म्हणजे जगाच्या पाठीवर भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ याचे अचूक ज्ञान असलेले राजे होते. काही दिवसांपूर्वी भगतसिंह कोश्यारी यांनी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रातल्या महापुरुषांबद्दल बेजबाबदार वक्तव्य केले होते. महापुरुषांची एलर्जी असलेल्या राज्यपाल कोश्यारी यांची महाराष्ट्रातून तात्काळ हकालपट्टी करा, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. काय म्हणाले राज्यपाल? आम्ही शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मला आता असे वाटते तुम्हाला कोणी विचारले तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला महाराष्ट्र बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला अनेक आयकॉन आढळतील. शिवाजी महाराज तर जुन्या युगातील आहेत. मी आधुनिक युगाबाबत बोलत आहे. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून महाराष्ट्र राज्यभर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.