बुलडाणा : वीज वापर केल्यानंतर वीज वसुलीसाठी आलेल्या वसुली पथकावर नेहमीच जीवघेणे हल्ले होतात. अनेक वेळा ही प्रकरणं पोलीस ठाण्यापर्यंत जातात. पण त्यानंतर काही निष्पन्न होत नाही. मात्र जेव्हा एखादं प्रकरण लावून धरलं जातं तर त्यामध्ये हल्लेखोराला शिक्षा देखील होते. असंच एक प्रकरण बुलडाण्यात न्यायालयाने निकाली काढला. थकीत वीज देयकाच्या वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या पथकातील तंत्रज्ञास शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी बुलडाणा न्यायालयाने एकाला दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. हा निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल खटी यांनी दिला. पाच वर्षांपूर्वी म्हणजे २१ नोव्हेंबर २०१७ चे प्रकरण आहे. महावितरणचे तंत्रज्ञ संजय शंकर बावणे आणि त्यांच्या सहकारी आरती बावणे या बुलडाणा शहरातील मिलिंदनगर परिसरात थकबाकी वसुलीसाठी गेले होते. पूर्णाबाई दशरथ झिने यांच्याकडे सुमारे ७ हजार ३० रुपयांची थकबाकी भरण्याच्या मागण्यासाठी ते गेले होते. यावेळी पूर्णाबाई दशरथ झिने यांनी त्यांच्या अंगावर जाऊन त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसंच दमदाटी केल्याची तक्रार बावणे यांनी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात केली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून न्यायालयात प्रकरण सुनावणीसाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल खटी यांच्यासमोर आले. सदर प्रकरणात न्यायालयाने कारावासाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. ग्राहकांना वीज बील भरणे डोईजड होते तेव्हा ते वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण सारखे हत्यार उपसतात. पण आता या निकालामुळे महावितरणच्या वीज वसुली पथकावर हात उगारण्याआधी निश्चित विचार करावा लागेल. असं या निर्णयावर म्हटल्यास वावगं ठरणार नाही. विज बिल भरा नाही तर होऊ शकते जेलवारी...