पोषण यंत्रणाच कुपोषित; साडेपाच लाख बालके 'तीव्र चिंते'च्या सीमेवर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 4, 2022

पोषण यंत्रणाच कुपोषित; साडेपाच लाख बालके 'तीव्र चिंते'च्या सीमेवर

https://ift.tt/Enb2I5e
मुंबई : कुपोषणावर मात करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध सर्वेक्षणांमध्ये मध्यम व तीव्र स्वरूपाच्या गटात बालकांची नोंदणी होते. राज्यातील अशा साडेपाच लाखांपेक्षा अधिक मुलांना तातडीने वैद्यकीय निगराणी व पोषण आहाराची गरज आहे. ही गरज योग्य वेळी पूर्ण झाली, तर तीव्र कुपोषित गटामध्ये जाण्यापासून त्यांना वाचवता येणे शक्य आहे. जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत राज्यातील पाच लाख २८ हजार ९२४ बालके कमी वजनाची आहेत. मध्यम कमी वजनाच्या मुलांची संख्या चार लाख ४६ हजार ८३७ इतकी असून, वजन तीव्रतेने कमी असलेल्या गटामध्ये ८२ हजार ८७ मुलांचा समावेश आहे. नंदुरबार, नाशिक, मुंबई, जळगाव, यवतमाळ, ठाणे, सोलापूर येथे मध्यम स्वरूपाचे वजन असलेल्या बालकांची संख्या राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक आहे. तीव्रतेने वजन कमी असलेल्या बालकांची संख्या अमरावती, औरंगाबाद, धुळे, गडचिरोली, चंद्रपूर, जळगाव, मुंबई, नंदूरबार येथे दिसून येते. कुपोषणाच्या विळख्यात असलेली बालके मध्यम स्वरूपाच्या कुपोषित गटातून तीव्र स्वरूपाच्या गटात येईपर्यंत त्यांच्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा अनुभव कुपोषणाच्या मुद्द्यांवर काम करणाऱ्या संस्था; तसेच आरोग्यदूतांकडून सांगितला जातो. गोवराचा संसर्ग वेगाने फैलावत असताना रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या या मुलांवर या साथीचा विळखा बसू शकतो. त्यामुळे तीव्र स्वरूपाच्या कुपोषित गटामध्ये ही बालके जाण्यापासून रोखणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. परिस्थितीचे चटके सहन करणाऱ्या अनेक गावांमध्ये स्थलांतरित समूह आहे. त्यांना शिधावाटपाची व्यवस्था नाही. या घटकामध्ये आरोग्याचे सर्वेक्षणही केले जात नाही. नोंद नसलेली कित्येक मुले सुटून जातात. त्यामुळे कुपोषित तसेच बालमृत्यूंची संख्या प्रत्यक्षात किती आहे, या प्रश्नाचे उत्तर संबधित यंत्रणांनी शोधायला हवे, ही मागणी सर्व स्तरांतून होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना उत्तम कामगिरी व नियोजनाबद्दल जो निधी, योजनांचा लाभ मिळतो त्यात गावात कुपोषित मुलांची संख्या सर्वांत कमी हवी, असा निकष अंतर्भूत असतो. त्यामुळेही हे आकडे लपवले जातात, असा आक्षेप प्रत्यक्ष गावागावांमध्ये काम करणारे आरोग्यदूत नोंदवतात. हा निकष काढून कुपोषणमुक्तीसाठी कोणत्या पद्धतीने काम करणे गरजेचे आहे, त्यासाठी कोणता पॅटर्न राबवला, अशा प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याची खरी गरज आहे, अशी भूमिका ग्रामीण पातळीवर काम करणारे बालरोगतज्ज्ञ डॉ. किरण मोरे यांनी मांडली. वजनकाटे कुणी अडवले ? सदोष वजन काटे हा अनेक वर्षांपासून चर्चेत येणारा विषय. वजनकाट्यांची समस्या सुटली की, कुपोषित बालकांची संख्या वाढती दिसेल, अशी भीती वाटते का, कुपोषित मुलांची संख्या सर्वाधिक असलेल्या अंगणवाडी क्षेत्रातील अंगणवाडी सेविकांवरही हे आकडे पारदर्शी मांडताना ताण येतो, यांकडे अंगणवाडी सेविका लक्ष वेधतात. अंगणवाडी कृती समितीच्या शुभा शमीम यांनी अनेक महिने पाठपुरावा केल्यानंतर मुंबईमध्ये वजनकाटे मिळाले आहेत मात्र राज्यात अनेक ठिकाणी ते आलेले नाहीत. कुपोषित मुलांची वर्गवारी जिल्हा - मध्यम कमी वजन - तीव्र कमी वजन नंदूरबार - ३६८७० -११९५६ - मुंबई - २७८०५- २१०० - २९९०५ जळगाव - २७४१६ - ४२७६ ठाणे - २२१९१- २६८२ - २४८७३ अमरावती - २०३८३ - ४६३२ औरंगाबाद - १५९९६ -३२८६ अहमदनगर- १५२५४ -२४७९ चंद्रपूर - १३९३५ - २८७५ बुलढाणा - ११३१६ - ११४३