मुंबईकरांचे टेन्शन आणखी वाढले; गोवरनंतर आता आणखी एका आजाराचा 'ताप' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, December 13, 2022

मुंबईकरांचे टेन्शन आणखी वाढले; गोवरनंतर आता आणखी एका आजाराचा 'ताप'

https://ift.tt/s0kAlpX
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः गोवराचा संसर्ग बरा झाल्यानंतर काही रुग्णांमध्ये न्यूमोनियाचा संसर्ग झाल्याचे दिसून येत आहे. गोवरामुळे रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे विविध प्रकारच्या संसर्गांचा जोर वाढू शकतो याकडे बालरोगतज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. गोवरानंतर वेगवेगळ्या स्वरूपाची लक्षणे उद्भवतात ती किती काळ टिकतात याकडे लक्ष देण्याची गरजही यानिमित्ताने तज्ज्ञांनी अधोरेखित केली आहे. राज्यात गोवरामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या १९ इतकी नोंदवण्यात आली आहे. यात सोमवारी मुंबईमध्ये एका संशयित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. १२ ते २४ महिने वयोगटांतील १० तर २५ ते ६० महिने वयोगटांतील चार जणांचा मृत्यू गोवराच्या संसर्गामुळे झाला आहे. यात नऊ मुलगे व १० मुलींचा समावेश आहे. राज्यात गोवर संसर्गाचे १२५ ठिकाणी रुग्ण सापडले असून मुंबईध्ये ६०, मालेगाव पालिका क्षेत्रामध्ये १२, भिवंडीमध्ये १०, ठाणे येथे चार ठिकाणी रुग्ण आढळले आहेत. १५ ते २५ डिसेंबर रोजी पहिला टप्पा तर १५ जानेवारी ते २५ जानेवारी या कालावधीमध्ये मोहिमेचा दुसरा टप्पा आखण्यात आला आहे. गोवरप्रभावित भागामध्ये एकूण १,२५२ सर्वेक्षण पथके कार्यरत करण्यात आली आहेत; तर आतापर्यंत पहिली मात्रा घेण्यात आलेल्या बालकांची संख्या २२,४४१ तर दुसरी मात्रा घेण्यात आलेल्या बालकांची संख्या १२,२१५ इतकी आहे. मुंबईतील स्थिती मुंबईत साकीनाका येथे राहणाऱ्या चार वर्षांच्या मुलीचा सोमवारी गोवराने मृत्यू झाला. याची नोंद संशयित मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. या मुलीला ६ डिसेंबर रोजी ताप आला, तर ९ डिसेंबर रोजी तिच्या चेहऱ्यावर आणि अगावर पुरळ येण्यास सुरुवात झाली. ११ डिसेंबरला तिला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती खालावत गेल्याने तिला अतिदक्षता विभागामध्ये हलवण्यात आले. मात्र योग्य ते उपचार करूनही तिची प्रकृती अधिकच खालावत जाऊन १२ डिसेंबरला तिचा मृत्यू झाला. प्राथमिक स्तरावर तिचा मृत्यू न्यूमोनियामुळे श्वसनप्रक्रिया बंद झाल्याने मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १६ झाली असून, यातील संशयित मृत्यू म्हणून नोंद झालेल्या बालकांची संख्या पाच झाली आहे. तसेच ११ जणांचा गोवराने मृत्यू झाल्याचे निश्चित झाले असून, यातील आठ जण मुंबईतील तर तीन जण हे मुंबईबाहेरील आहेत.