
सोलापूर : तिरुपती इथे बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या सोलापूर शहरातील तरुणांच्या टवेरा गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात जुळे सोलापुरातील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसंच इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अर्थव टेंभुर्णीकर, मयुर मठपती, ऋषिकेश जंगम व अजय लुट्टे या चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास चंद्रगिरी मंडलातील नायडूपेठ-पूथलापडू या मुख्य महामार्गावर हा अपघात झाला.जुळे सोलापुरातील जानकी नगर येथील नऊ मित्र हे तिरुपती बालाजी मंदिराला दर्शनासाठी टवेरा चारचाकी वाहन घेऊन गेले होते. दर्शन घेऊन परत येताना भरधाव वेगातील एम. एच. १२ पीएच ९७०१ ही गाडी डीव्हायडरला धडकली. या अपघातात वाहनात समोरील बाजूस बसलेले चौघे मित्र जागीच ठार झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की टवेरा वाहनाचा समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. रस्त्यावर छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह बाहेर पडल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अपघाताची माहिती मिळताच जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून तिरुपती येथील रुईया रुग्णालयात हलवण्यात आले. जखमीपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेबाबत कळताच सोलापुरातील मृतांचे आणि जखमींचे नातेवाईक तिरुपतीकडे रवाना झाले. या अपघाताप्रकरणी चंद्रगिरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.दरवर्षी मित्र तिरुपतीला जात होतेदरवर्षी हे मित्र आंध्रप्रदेश येथील तिरुपती बालाजीला दर्शनासाठी जात होते. २३ जानेवारीला देखील या सर्व मित्रांनी बालाजीला जाण्याचे नियोजन केले होते. टवेरा कार घेऊन ते निघाले आणि सुखरूप बालाजीला पोहोचले होते. मात्र दर्शन घेऊन परत येताना भीषण अपघात झाला. व्हीव्हीपी इंजिनिअरिंग महाविद्यालयातून या तरुणांनी शिक्षण पूर्ण केले आहे. जुळे सोलापुरातील जानकी नगर या एकाच गल्लीत सर्व मित्रांचे घर आहे. या अपघाताने गुरुवारी दिवसभर जानकी नगर परिसरात शोककळा पसरली होती.