मातीची घरे अन् चुलीवरचा स्वयंपाक, संपूर्ण गावात एकच फोन; ३०० वर्षांपूर्वीची परंपरा जपणारे 'वैदिक गाव' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, January 3, 2023

मातीची घरे अन् चुलीवरचा स्वयंपाक, संपूर्ण गावात एकच फोन; ३०० वर्षांपूर्वीची परंपरा जपणारे 'वैदिक गाव'

https://ift.tt/JezDA7j
टाइम्स वृत्त, हैदराबादः मातीचे घर अन् शेणाने सारवलेल्या भिंती... वीज नाही, मोबाइल, इंटरनेट नाही, टीव्हीच काय इतर कोणतीही आधुनिक उपकरणे नाहीत, अगदी स्वयंपाकाचा गॅसही नाही...अशा वातावरणात आज कोणी राहू शकेल काय? पण ही किमया साधली आहे, आंध्र प्रदेशमधील कुर्मग्राम या ‘वैदिक गावा’ने. सुमारे तीनशे वर्षांपूर्वी आपले पूर्वज जसे राहत होते, त्याच पद्धतीने हे गाव आज जगत आहे. नेमके कुठे आहे कुर्मग्राम? आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील श्रीमुखलिंगम गावापासून सहा किलोमीटरवर कुर्मग्राम वसलेले आहे. सुमारे साठ एकर परिसरात हे गाव वसलेले आहे. या गावात ५६ घरे असून, ती सिमेंट आणि स्टील न वापरता उभारली आहेत. गावात कोणाकडेही कोणतेही आधुनिक उपकरण किंवा सोयीसुविधा नाहीत. संपूर्ण गावात संपर्कासाठी केवळ एकच लँडलाइन फोन आहे. गरिबी नव्हे; तर निवड कुर्मग्राममधील ग्रामस्थ गरीबीमुळे असे राहत नसून, त्यांनी या जीवनशैलीचा अंगीकार स्वत:च्या पसंतीने केलेला आहे. आधुनिक जीवनातील लोभांना त्यांनी दूर सारले असून, ‘साधी राहणी, उच्च विचारसरणी’ या श्रीकृष्ण भावनामृत (कृष्ण कॉन्शियसनेस) तत्त्वज्ञानाचा स्वीकार केला आहे. भौतिक सुखांपेक्षा कमीत कमी गरजा आणि स्वावलंबन यामु‌ळे जीवनाला अर्थ आणि उद्देश प्राप्त होतो, असा येथील कृष्णभक्तांचा विश्वास आहे. प्राचीन जीवनशैली - कुर्मग्राममधील ग्रामस्थांचा दिवस पहाटे साडेतीन वाजता सुरू होतो आणि संध्याकाळी साडेसात वाजता संपतो. - गावकरी आपले कपडे स्वत: विणतात. आपल्याला लागणारा भाजीपाला, धान्ये, फळे स्वत: पिकवतात. वस्तुविनिमय करून (बार्टर सिस्टीम) शेजारील गावांकडून या शेतमालाच्या मोबदल्यात इतर जीवनावश्यक वस्तू घेतल्या जातात. - गावाची अर्थव्यवस्था शेती आणि गायींवर अवलंबून आहे. शिक्षक काय म्हणतात? कृष्णभक्तीसाठी आपली ‘आयटी’मधील नोकरी सोडून गावातील गुरुकुलमध्ये शिक्षक म्हणून काम करणारे राधाकृष्ण चरणदास यांनी सांगितले, ‘पूर्वीच्या काळी लोक कमी गोष्टींमध्येही समाधानी होते. आता भौतिक संपत्तीसाठी ते हपापलेले दिसतात. हे चित्र वेदनादायी आहे.’ गुरुकुलात वैदिक शिक्षण गावातील गुरुकुलात विद्यार्थ्यांना वैदिक पद्धतीने शिक्षण दिले जाते. शिक्षण म्हणजे केवळ माहिती गोळा करणे नसून, स्वत:ची ओळख होणे म्हणजे शिक्षण आहे, असे येथील लोक मानतात. विद्यार्थ्यांना नीतीमूल्ये आणि उच्च विचारसरणीचे धडे दिले जातात. सकाळी साडेचार वाजता आरती, एक तास जप, गुरुपूजा आणि त्यानंतर पुस्तक वाचन केले जाते. सकाळी नऊ वाजता वर्ग सुरू होतो. गणित, विज्ञान, संस्कृत, तेलुगू, हिंदी, इंग्रजी, शास्त्रे, कला आणि महाभारत हे विषय शिकविले जातात. पोहण्यापासून ते कबड्डीपर्यंत अनेक खेळ मुले खेळतात. दहा वर्षांच्या शिक्षणानंतर मुलांचा कल पाहून त्यांना पुढील शिक्षणासाठी सालेम येथील वैदिक विद्यापीठात पाठविले जाते. पर्यटकांची वाढती संख्या कुर्मग्रामबाबतची माहिती पसरल्यानंतर या गावाला भेट देणाऱ्यांची संख्या ‌वाढली आहे. आठवड्याभरात शेकडो; तर रविवारी हजारो पर्यटक गावाला भेट देतात. पर्यटकांना नियम पाळून आश्रमात राहता येते. काही परदेशी शिष्यांनी कुर्मग्राममध्ये कायमचे वास्तव्य केले आहे. मूळचे रशियन असलेल्या नृहरी दास (सध्याचे नाव) यांनी सांगितले, ‘प्राचीन वैदिक ज्ञानाने मला या गावापर्यंत आणले. ज्या व्यक्ती आध्यात्मिक मार्गावर चालत आहेत, त्यांनी इतर कोणत्याही गरजेची पर्वा करण्याची आवश्यकता नाही; कारण या जीवनशैलीत निर्माण झालेल्या गरजांची पूर्तता निसर्ग स्वत:च करतो.’