आईचं निधन, वडिलांना सांभाळण्यासाठी लेक गावी आला; मात्र शेतात वणवा भडकताच होत्याचं नव्हतं झालं! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, March 15, 2023

आईचं निधन, वडिलांना सांभाळण्यासाठी लेक गावी आला; मात्र शेतात वणवा भडकताच होत्याचं नव्हतं झालं!

https://ift.tt/KlI89r6
रत्नागिरी : कोकणात सातत्याने लागणारे वणवे हे आता शेतकऱ्यांच्या जीवावर बेतू लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच रत्नागिरीतील हातखंबा येथे एका शेतकऱ्याचा वणवा विझवताना आगीत होरपळून मृत्यू झाला होता. अशाच दुर्घटनेची आता पुनरावृत्ती झाली असून दापोली तालुक्यात लाडघर येथे एका शेतकऱ्याने आपले प्राण गमावले आहेत. तालुक्यातील लाडघर येथे अनिल दत्तात्रय झगडे (वय ६०) या शेतकऱ्याचा वणवा विझवताना होरपळून मृत्यू झाला आहे. लाडघर येथील झगडेवाडी ते दवंडेवाडी या सुमारे दीड ते दोन किलोमीटरच्या परिसरामध्ये सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास वणवा पेटला होता. हा वणवा अनिल झगडे यांच्या जागेमधून पुढे भडकत गेला. झगडे हे बागेत काम करत असता त्यांच्या आग भडकत असल्याचे लक्षात आलं आणि आपल्या आवारातील वनसंपदा वाचवण्यासाठी ते वणवा विझवण्यासाठी म्हणून धावपळ करू लागले. मात्र या वणव्यातील आगीच्या भक्षस्थानी ते आले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अनिल झगडे हे सकाळी १० वाजता कामासाठी रानात गेले होते. ते दुपारपर्यंत घरी न परतल्याने ग्रामस्थांनी त्यांचा शोधाशोध सुरू केली, यावेळी ग्रामस्थांना शोध घेत असताना या वणव्यामध्ये त्यांचा होरपळून मृत्यू झाल्याचे दिसले. त्यानंतर या सगळ्या घटनेची खबर लाडघरचे पोलीस पाटील प्रमोद म्हादू पवार यांनी दापोली पोलिसांना दिली आहे. दापोली पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदन अहवालानंतर अनिल झगडे यांचा वणव्यात होरपळून मृत्यू झाल्याची माहिती दिली. दरम्यान, या वणव्यामुळे लाडघर परिसरातील वनसंपदेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. यामध्ये जंगली वृक्ष आणि वन्यजीवांची हानी झाल्याची माहिती समोर येत आहे. हा वणवा लागल्याचे परिसरातील नागरिकांना समजल्यानंतर ग्रामस्थांनी फवारणी यंत्रासह धाव घेतली. परिसरामध्ये आंबा आणि काजूच्या मोठ्या बागाही आहेत. शर्थीचे प्रयत्न करून नागरिकांनी या बागा वाचवल्या आहेत. मात्र अनिल झगडे या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अनिल झगडे हे उत्तम रिक्षाचालक होते. मुंबईत असतानाही त्यांचा रिक्षाचा व्यवसाय होता. झगडे यांच्या आईचं गेल्या वर्षी निधन झालं होतं. त्यामुळे गावी घरी वडील एकटे असल्याने मुंबई सोडून हे कुटुंब गावी स्थायिक झाले होते. गावी आल्यावरही अनिल झगडे यांचा रिक्षाचा व्यवसाय सुरू होता. अनिल झगडे यांच्या पश्चात पत्नी, वडील, दोन मुली, एक मुलगा असा मोठा परिवार आहे.