कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताची पकड कुठे निसटली, जाणून घ्या टर्निंग पॉइंट... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, March 10, 2023

कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताची पकड कुठे निसटली, जाणून घ्या टर्निंग पॉइंट...

https://ift.tt/3OqJ0xk
अहमदाबाद : चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतानेही चांगला खेळ केला, पण त्यांना यश मिळाले नाही. भारताला या खेळात पकड बनवण्याची संधी आली होती. पण ही संधी त्यांनी गमावली. त्यामुळे पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व असल्याचे पाहायला मिळाले.पहिल्या दिवशी उपहार ते चहापान या पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात एकही विकेट नाही, मालिकेत हे पहिल्यांदाच घडले. दहा वर्षांत प्रथमच पाहुण्या संघाने एका सत्रात एकही विकेट गमावली नाही. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी ४० वेळा उपाहारापूर्वी पंचांकडे विकेटसाठी दाद मागितली होती, तर या कसोटीत संपूर्ण दिवसात भारतीयांनी केवळ ३४ वेळा. त्यानंतरही दिवसातील शेवटचा तास सोडल्यास ऑस्ट्रेलियास षटकामागे जेमतेम २.५ ची धावगती राखता आली होती. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या संयमाची चांगलीच परिक्षा पाहिली. अर्थात, या परिस्थितीत भारतीयांनी दुसरा नवा चेंडू जरा लवकरच घेतला. अखेरची तीन ते चार षटके असताना तो घेतल्यास नव्या दिवशीही सकाळी तो नवा असतो हेच धोरण असते; पण भारतीयांनी नऊ षटके असताना नवा चेंडू घेतला आणि त्यात ऑस्ट्रेलियाने ५४ धावा वसूल केल्या. पहिल्या नव्या चेंडूप्रमाणेच दुसऱ्या नव्या चेंडूवरही भारतीय अपयशी ठरले होते. ऑस्ट्रेलियाने पहिल्या १४ षटकांत ५६ धावा केल्या. त्यानंतर अश्विनने धावगतीस 'ब्रेक' लावला. दुसऱ्या तासात १९ धावाच होत असताना भारतीयांनी दोन विकेटही घेतल्या. दुसऱ्या सत्रातील ३३ षटकांत ऑस्ट्रेलिया ७४ धावाच करू शकले; पण त्यांनी विकेट गमावली नाही. चहापानानंतर भारतीयांनी झटपट दोन विकेट घेऊन दडपण आणले; पण नव्या चेंडूने भारताची पकड निसटली. ऑस्ट्रेलियाचे १९ धावांच्या आत दोन फलंदाज बाद झाल्यावर ख्वाजा आणि कॅमेरून ग्रीनने पाचव्या विकेटसाठी ८५ धावांची अभेद्य भागीदारी रचली आहे. अर्थात, कांगारूंच्या धावसंख्येत ख्वाजाचा मोलाचा वाटा आहे. तो डेव्हिड वॉर्नर किंवा मॅथ्यू हेडनसारखा आक्रमक नाही. त्याची फलंदाजी भले आकर्षक नसेल. मर्यादाची पूर्ण जाणीव असल्याने तो धोका पत्करत नाही. हीच गोष्ट पहिल्या दिवशी पाहायला मिळाली.