
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : जगभरातील सर्वोत्तम विमानतळांच्या पाच श्रेणींमध्ये मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला कुठलेही मानांकन मिळालेले नाही. केवळ ‘४ कोटी प्रवासीसंख्या’ या एकमेव श्रेणीत हे विमानतळ आशियात सर्वोत्तम ठरले आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषदेच्या (एसीआय) अहवालात ही बाब समोर आली आहे.‘एसीआय’ने अलिकडेच आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम प्रवासी अनुभव असलेल्या विमानतळांची मानांकने जाहीर केली. त्यामध्ये एकूण सहा श्रेणींचा समावेश आहे. त्यामध्ये ‘सर्वाधिक समर्पित कर्मचारीवर्ग’, ‘सर्वात सोपा विमानतळ प्रवास’, ‘सर्वाधिक आनंददायी विमानतळ’ व ‘सर्वाधिक स्वच्छ विमानतळ’ या चार श्रेणी नव्याने समाविष्ट केल्या आहेत. या चारही श्रेणीत मुंबईच नाही तर देशातील एकाही विमानतळाचा समावेश नाही.-बेंगळुरूचे विमानतळ हे जागतिक स्तरावरील सर्वोत्तम आगमनासाठीचे विमानतळ ठरले आहे. मुंबईच्या विमानतळावर बेंगळुरूने मात केली आहे.-प्रवासीसंख्या व क्षेत्रनिहाय विमानतळांना एसीआयने मानांकन दिले आहे. त्यातील वार्षिक ४ कोटी प्रवासीसंख्या उपश्रेणीत मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आशियापुरते सर्वोत्तम ठरले आहे.