विजय गुजरातचा पण चर्चा मात्र चेन्नईच्या मराठमोळ्या शिलेदारांची - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, April 1, 2023

विजय गुजरातचा पण चर्चा मात्र चेन्नईच्या मराठमोळ्या शिलेदारांची

https://ift.tt/ZQajNHJ
अहमदाबाद : गतविजेत्या गुजरात टायन्सच्या संघाने या हंगामात विजयाची बोहनी केली. शुभमन गिलच्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरातने हा सामना पाच विकेट्स राखत जिंकला खरा, पण सामना संपल्यावर जोरदार चर्चा होती ती चेन्नईच्या मराठमोळ्या शिलेदारांची. कारण या सामन्यात चेन्नईच्या संघातील ऋतुराज गायकवाड, राज्यवर्धन हंगरगेकर आणि तुषार देशपांडे यांनी प्रभाव पाडला. चेन्नईने गुजरातपुढे विजयासाठी १७९ धावांचे ठेवले होते.चेन्नईच्या १७९ धावांचा पाठलाग करताना गुजरातने चांगली सुरुवात केली. पण अखेर महाराष्ट्राचा वेगवान गोलंदाज राज्यवर्धन हंगरगेकरने चेन्नईला पहिले यश मिळवून दिले. राज्यवर्धनने यावेळी वृद्धिमान साहाला २५ धावांवर बाद केले. त्यानंतर शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्यामध्ये चांगली भागीदारी रचली जात होती. पण यावेळी पुन्हा एकदा राज्यवर्धन चेन्नईच्या मदतीला धावला. राज्यवर्धनने सुदर्शनला २२ धावांवर बाद केले आणि चेन्नईला दुसरे यश मिळवून दिले. गुजरातला दोन धक्के बसले असले तरी गिल मात्र खेळपट्टीवर तग धरून उभा होता. गिलने यावेळी ३६ चेंडूंत ६ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ६३ धावांची खेळी साकारली.गुजरातने टॉस जिंकला आणि तिसऱ्याच षटकात त्यांनी चेन्नईला पहिला धक्का दिला. गुजरातने तिसऱ्याच षटकात चेन्नईचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवेला बाद केले. त्यानंतर बेन स्टोक्स आणि अंबाती रायुडू यांच्या रुपात दोन मोठे धक्के एकामागून एक बसले. स्टोक्स हा भावी कर्णधार असल्याचे म्हटले जात आहे. पण यावेळी त्याला लौकिकाला साजेशी फलंदाजी मात्र करता आली नाही. स्टोक्स यावेळी ७ धावांवर बाद झाला, तर रायुडूने १२ धावांवर समाधान मानावे लागले. पण चेन्नईचे विकेट्स पडत असले तरी ऋतुराज मात्र पाय रोवून खेळपट्टीवर उभा होता. ऋतुराजने मात्र आपल्याला या गोष्टींचा काहीच फरक पडत नसल्याचे दाखवून दिले. सुरुवातीपासूनच ऋतुराजने गुजरातच्या गोलंदाजीवर आक्रमण करायला सुरुवात केली. ऋतुराजने सुरुवातीला हार्दिकच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. त्यानंतरही ऋतुराजने आपली फटकेबाजी कायम ठेवली आणि त्यानंतर त्याने २३ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. ऋतुराज अर्धशतक झळकावल्यावर अधिक आक्रमक खेळायला लागला आणि शतकाच्या दिशेने त्याने कूच केली. ऋतुराज आता शतक झळकावणार असे वाटत होते. पण मोठा फटका मारण्याच्या नादात त्याने आपली विकेट्स गमावली. ऋतुराजने यावेळी ५० चेंडूंत ४ चौकार आणि ९ षटकारांच्या जोरावर ९२ धावांची खेळी साकारली. ऋतुराजच्या ९२ धावांच्या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने १७८ धावांचा डोंगर उभारला.