
अहमदाबाद : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना २०१९ मधील कर्नाटकमधील कोलार येथील भाषणात मोदी आडनावाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं मानहानीच्या खटल्यात सूरत कोर्टानं दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यामुळं राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी गमवावी लागली. पुढे, त्यांना शासकीय निवासस्थान देखील सोडावं लागलं आहे. आता राहुल गांधी यांच्याकडून हायकोर्टात या प्रकरणी दाद मागण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री , आपचे खासदार संजय सिंह आणि बिहारचे उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे.अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्या विरोधात मानहानीचा खटला गुजरात विद्यापीठानं केला आहे. तर, तेजस्वी यादव यांच्या विरोधातील मानहानीचा खटला व्यापारी हरेश मेहता यांनी केला आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या विरोधात अहमदाबादमध्ये सुनावणी १ मे रोजी होणार आहे. गुजरातच्या लोकांचा अपमान करणारं वक्तव्य केल्या प्रकरणी हा खटला दाखल करण्यात आला आहे. तेजस्वी यादव यांनी सद्यस्थितीत गुजराती ठग असू शकतात, असं वक्तव्य केलं होतं. यानंतर व्यापारी तक्रारकर्ता हरेश मेहता यांनी तेजस्वी यादव यांनी संपूर्ण गुजराती समाजाचा अपमान केल्याचा दावा आहे. या प्रकरणी पहिली सुनावणी १ मे रोजी होणार आहे. अहमदाबाद अतिरिक्त महानगरीय दंडाधिकारी यांच्या कोर्टात ही सुनावणी होणार आहे. दुसरीकडे अरविंद केजरीवाल आणि संजय सिंह यांच्या विरोधात गुजरात विद्यापीठाबद्दल चुकीची माहिती दिल्यामुळं मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन्ही नेत्यांना समन्स जारी करण्यात आलं आहे. २३ मे रोजी दोन्ही नेत्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं आहे. दोन्ही नेत्यांनी गुजरात विद्यापीठाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गुजरात विद्यापीठाकडून करण्यात आला आहे. गुजरातमधील वरिष्ठ पत्रकार दिलीप पटेल यांनी ही तिन्ही प्रकरण राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं म्हटलं. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांविरोधात गुन्हे का दाखल होत नाहीत, असं ते म्हणाले. राजकीय विश्लेषक डॉ. जयेश यांनी नेत्यांनी यापुढील काळात जपून वक्तव्य केली पाहिजेत, असं म्हटलं.