बळीराजाचं पिवळं सोनं डोळ्यांदेखत वाहून गेलं, अवकाळी पावसाचं भीषण रूप दाखवणारा हा VIDEO पाहाच... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, April 19, 2023

बळीराजाचं पिवळं सोनं डोळ्यांदेखत वाहून गेलं, अवकाळी पावसाचं भीषण रूप दाखवणारा हा VIDEO पाहाच...

https://ift.tt/Skw20XQ
हिंगोली : यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच एखादा आठवडा उलटत नाहीये तर कुठे ना कुठे पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यातसुद्धा उन्हाळा ऋतू लागल्याची जाणीव होत नाहीये. अर्ध्याच्या वर उन्हाळा संपत आला तरी अवेळी आणि अवकाळी पावसाचा जोर हिंगोली जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये बघायला मिळतो आहे. यावेळी पावसामुळे लग्नसराई त्याचबरोबर फळबागा, हळद उत्पादक शेतकरी यांची चिंता वाढवणारा हा पाऊस आहे.नैसर्गिक संकटाच्या माऱ्यामुळे खरीप, रब्बी हाताचा गेल्यानंतर हळद पैसा देईल अशी शेतकऱ्यांना वाटले होते. परंतु, ऐन काढणीच्या वेळी हळदीवर अवकळीचा मारा होत आहे. काल हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस कराळे परिसरात झालेल्या गारांसह अवकाळी पावसात शेकडो शेतकऱ्यांची हळद भिजली. या संकटामुळे शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फेरले गेले.जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीननंतर हळद लागवडीला महत्त्व देतात. यंदा जिल्ह्यात ३४ हजार २३० हेक्टरवर हळदीची लागवड झाली होती. मागील पंधरवड्यापासून हळद काढण्याची लगबग सुरू झाली असून काही भागात हे काम अंतिम टप्प्यात आहे. ज्या भागात शेतकऱ्यांची हळद काढणी झाली, त्यांनी शिजवून हळद शेतात ठवली आहे. हळद वाळवत असताना अशा परिस्थितीत अवकाळीचा मारा होत असल्याने आता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला.पंधरवड्यापूर्वी जिल्हाभरात गारांचा पाऊस झाला. या पावसात हरभरा, गहू, ज्वारीसह हळद आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचा आकडा साडेपाच हजार हेक्टरवर पोहोचला असताना आता पुन्हा दोन दिवसापासून अवकाळीचा मारा होत आहे. मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास दिग्रस कराळेसह परिसरात सुमारे वीस मिनिटे गारांचा पाऊस झाला. आभाळच फाटल्यामुळे कापड तरी किती वेळा झाकणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच सोन्यासारख्या हळदीला अवकाळी पावसाचा डाग लागत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले आहेत.