
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: 'महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांचे पक्षश्रेष्ठी दिल्लीत असल्यामुळे ते सतत दिल्लीला हेलपाटे मारतात. उपमुख्यमंत्री हा फार चांगला माणूस आहे; पण त्यांच्यावर फुटलेल्या गटाची गाडी चालविण्याची जबाबदारी आहे. केंद्राने त्यांच्यावर टाकलेल्या जबाबदाऱ्यांतून देवाने त्यांची मुक्तता करावी, अशी प्रार्थना करतो,' असा टोला खासदार यांनी लगावला.'शहरी माओवाद वाढत असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे; पण या आरोपात कितपत तथ्य आहे? फडणवीस हे तत्कालीन मुख्यमंत्री असताना भीमा-कोरेगावची दंगल झाली होती. त्या वेळेस शहरी माओवादाचा आरोप त्यांनी केला होता. शहरी माओवादास फडणवीस यांचे सरकार जबाबदार आहे,' असा आरोप राऊत यांनी केला.'महाराष्ट्रातील युवकांना तुम्ही रोजगार दिला नाही. तुमचे सरकार शेतकरी, कष्टकरी आणि बेरोजगारांच्या समस्येवर मार्ग काढण्यास अपयशी ठरले. त्यामुळे अशा प्रवृत्ती वाढत आहेत. खोट्या प्रकरणात तुम्ही लोकांना अडकवून त्यांना दहशतवादी ठरवीत आहात,' असा आरोप त्यांनी केला.सत्ताधारी भाजपकडून सापत्न वागणूक मिळत आहे, असा आरोप शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी केला आहे. याविषयी राऊत म्हणाले की, 'कीर्तिकर हे आमचे जुने सहकारी आहेत. त्यांनी जे सांगितले ते सत्य आहे. आमची भाजपशी पूर्वी युती होती. तेव्हा ते आम्हाला अशीच वागणूक देत होते. दिलेला शब्द पाळत नव्हते. सर्व आश्वासने हवेत विरली. आमच्या प्रमुख नेत्यांचा अपमान केला जात होता. शिवसेनेला संपवण्याचा डाव भाजपने आखला होता. त्यामुळेच आम्ही सावध झालो. आम्ही भाजपची साथ सोडली. ती भाजप विरोधातील चीड होती,' असा दावा संजय राऊत यांनी केला.