
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: 'मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा विचार दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनामध्ये नाही, हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो', अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी ''मध्ये मांडून याबाबत सातत्याने टीका करणाऱ्या शिवसेनेच्या आरोपांमधील हवाच काढून टाकली आहे. या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीमध्ये पवार यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते , तसेच त्यांच्या पक्षाच्या भूमिकांवर टीकास्त्र सोडले आहे.'लोक माझे सांगाती' या पवारांच्या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन मंगळवारी पार पडले. त्याच कार्यक्रमामध्ये पवार यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केल्याने सगळे वातावरण बदलून गेले होते. आता मात्र त्या पुस्तकामध्ये नव्याने जोडण्यात आलेल्या प्रकरणातील अनेक गोष्टींची चर्चा सुरू झाली आहे. या पुस्तकात पवार यांनी शिवसेना व काँग्रेस या महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांच्या मानसिकतेवर व त्यांच्या नेत्यांच्या कृतीवर थेट बोट ठेवले आहे.नुकत्याच मुंबईत झालेल्या 'वज्रमूठ सभे'मध्ये उद्धव ठाकरे यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याच्या आरोपाचा पुनरूच्चार केला होता. किंबहुना गेली अनेक वर्षे हा मुद्दा शिवसेनेच्या प्रचारामध्ये कळीचा असतो. मात्र, पवार यांनी पुस्तकात या दाव्याच्या विपरित भूमिका घेतली आहे. (पुस्तकातील पृष्ठ क्रमांक ४१७) 'मुंबई केंद्रशासित होण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळायला हवा. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करावी, असे दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनात नाही हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो', असे ते म्हणाले. याच पुस्तकातील ३१८व्या पानावर पवार यांनी शिवसेनेच्या कट्टर हिंदुत्ववादाचाही समाचार घेतला आहे. 'महाविकास आघाडी आकाराला येताना शिवसेनेचा कट्टर हिंदुत्ववाद मारक ठरेल, अशी भीती काहींना होती. शिवसेनेच्या बाबतीत माझे मत ऐकाल तर, हा पक्ष वेळोवेळी कितीही जोरकसपणे भूमिका मांडो, त्यांचा वैचारिक पाया तितका भक्कम नाही. शिवसेनेच्या पूर्वेतिहासावर नजर टाकली तर राजकारणासाठी लागणारी लवचिकता त्यांनी वारंवार दाखविली आहे', असे पवार यांनी नमूद केले आहे. आणीबाणीमध्ये शिवसेनेने इंदिरा गांधी यांना दिलेल्या पाठिंब्याची तसेच त्यानंतरच्या निवडणुकीमध्येही त्यांना पाठिंबा देऊन विधान परिषदेतील दोन आमदारपदे मिळविल्याच्या इतिहासाची पवार यांनी आठवण करून दिली आहे. 'मुस्लिम व दलित विरोध हा शिवसेनेच्या भूमिकेतील एक पैलू झाला. परंतु तो दिसतो तेवढा टोकाचा नाही', असे आमचे निरीक्षण होते', असेही त्यांनी नमूद केले आहे.महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेकडून यावर अजूनही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पक्षाचे नेते संजय राऊत यांनी याबद्दल उद्धव ठाकरे सविस्तर बोलणार असल्याचे जाहीर केले. तर, ठाकरे काय भूमिका घेणार, यावरच आता महाविकास आघाडीची भविष्यातील वाटचालीची दिशा स्पष्ट होणार आहे.