
चंद्रपूर: कोलाम गुड्याचा दुःखाला अंत उरला नाही. पिण्याचा पाण्यासाठी गाव आकाशाकडे डोळे लावून असते. काय तर उन आल्याखेरीज या गावातील नळाना पाणी पुरवठाच होत नाही. ज्या दिवशी उन त्या दिवशी पाणी. ढगाळ वातावरण असल्यास डोंगराचा पायथ्याशी उतरून पाणी आणावे लागते. त्यासाठी तब्बल दोन कि.मी. अंतर गावकऱ्यांना तुडवावे लागते. या गावाचे नाव आहे रायपूर (खडकी). हे गाव चंद्रपूर जिल्हाचा शेवटच्या टोकावर असलेल्या जीवती तालुक्यात येतं. जीवती तालुक्यातील रायपूर (खडकी) गावाची लोकसंख्या जेमतेम १५० आहे. ग्रामपंचायत गावापासून तीन किमी अंतरावर आहे. स्वातंत्र्याची ७५ वर्षे उलटली मात्र गावाचा चेहरा भक्कास अन उजाळच आहे. पाण्यासाठी गावाला मोठी पायपीट करावी लागते. डोंगराचा पायथ्याशी असलेल्या विहिरीतून गावाला पाणी पुरवठा केला जातो. विहिरीतील पाणी गावात असलेल्या टाकीत सोलर मोटरने सोडलं जातं. तिथून नळांना पाणी सोडलं जातं. उन नसलं तर सोलर चालत नाही परिणामी पाणी पुरवठा ठप्प होतो. ज्या विहिरीतून गावाला पाणी पुरवठा केला जातो. त्या विहिरीवर आंब्यांचे झाड कोसळले होते. पाण्यात अळ्या पडल्या होत्या. दोन वर्षापासून या विहिरीत निर्जंतुकिकरणासाठी साधे ब्लिचिंग पावडरही टाकन्यात आलेले नव्हते. गावाचा ही बिकट पाणी समस्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनने पुढे आणली. बातमीची दखल घेत प्रशासनाने विहीर स्वछ केली. रस्ता साफ केला. मात्र आता ढगाळ वातावरणाने गावावर पाणी संकट ओढवले आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांना दोन किमी डोंगर उतर, चढावं करावा लागतो. कुटुंबातील लहान मुलांनाही मोठी पायपीट करावी लागते. अनेकदा पाय घसरून पडल्याचा घटना घडल्या आहेत. त्यामुळे विहिरीवर विद्युत मोटर पंप बसवावे, अशी गावाकऱ्यांची मागणी आहे.