नवरीला हळद लावण्यासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, स्कॉर्पिओच्या भीषण अपघातात ४ ठार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, April 18, 2024

नवरीला हळद लावण्यासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, स्कॉर्पिओच्या भीषण अपघातात ४ ठार

https://ift.tt/XFxs1Hn
बुलढाणा : नवरीला हळद लावण्यासाठी जालनाल्या निघालेल्या अंबाशी येथील देशमुख कुटुंबियांवर काळाने घाला घातला आहे. नवरदेवाकडची भरधाव स्कार्पिओ देऊळगाव मही ते देऊळगाव राजा रस्त्यावर दगडवाडी जवळ पलटी झाली. आज सायंकाळच्या दरम्यान हा अपघात घडला. या अपघातात देशमुख कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. स्कार्पिओच्या चालकाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अंबाशी तालुका चिखली येथील देशमुख कुटुंबात उद्या १८ एप्रिल रोजी लग्न होते. या लग्नाआधी नवरीला हळद लावण्यासाठी दोन वाहने जालना येथे जाण्यासाठी निघाली होती. यातील स्कार्पिओ जीप क्रमांक एम एच २८ बी क्यू ०६०६ यावरील चालकाचा ताबा सुटून गाडी दगडवाडी फाट्याजवळ पलटी झाली आणि भीषण अपघात घडला. या अपघातात विलास जयवंतराव देशमुख वय ६३, अशोक भीमराव नयाके रा. सवना वाशीम वय ६५, वसंत देविदास देशमुख वय ४३ रा. अमानी वाशीम हे जागीच ठार झाले. तर वाहन चालक योगेश लक्ष्मण देशमुख याच्या छातीला जबर मार लागला. त्याच्या फुफुसात रक्तस्त्राव झाल्याने त्याला जालना येथे हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. या भीषण अपघातात मीरा संजय देशमुख, शालिनी अनंता देशमुख, अक्षदा संदीप देशमुख, गोपाळ देशमुख, गजानन आसाराम तौर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त वाहनात एकूण ११ जण होते, तर मागील वाहनात नवरदेवासह देशमुख कुटुंबातील व्यक्ती होते. मृतांमध्ये दोन जण पाहुणे असून ते मूळचे अंबाशी येथीलच रहिवासी होते.