
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : वाढत्या प्रवासी गर्दीमुळे पश्चिम रेल्वेने हार्बर मार्गाचा बोरिवलीपर्यंत दोन टप्प्यांत विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मे महिन्यात निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेचे केले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बोरिवलीपर्यंत पश्चिम रेल्वे व हार्बर रेल्वे असे दोन पर्याय उपलब्ध होणार आहेत.एप्रिल, २०२३ ते मार्च, २०२४ या आर्थिक वर्षात पश्चिम रेल्वेवरील प्रवासी संख्या बोरिवली ते विरारदरम्यान वाढली आहे. यामुळे हार्बर विस्तारीकरण जलदगतीने पूर्ण करण्यासाठी गोरेगाव ते मालाड (२ किमी) आणि मालाड ते बोरिवली (६ किमी) असा मार्ग पूर्ण करण्यात येणार आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरेगावपर्यंत हार्बर सेवा आहे. गोरेगाव ते मालाड पहिला टप्पा सन २०२६-२७ आणि मालाड ते बोरिवली दुसरा टप्पा सन २०२७-२८पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यासाठी ८२५ कोटी रु.चा खर्च अपेक्षित आहे. मे महिन्यात निविदा काढून जूनच्या आधी प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे भविष्यात वातानुकूलित लोकल चालवणेही शक्य होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.