
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने हेलिकॉप्टरपासून होड्यांपर्यंत आणि घोड्यांपासून हत्तीपर्यंतचा वापर करण्याची सज्जता निवडणूक आयोगाने केली आहे. आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सुरक्षेच्या कारणास्तव बूथपर्यंत पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टर, हत्ती, घोडे आणि बोटींचा वापर केला जात आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या निवडणूक आयोगांबरोबर पूर्वतयारीचा आढावा घेताना या सर्व मुद्द्यांचा आढावा घेतला. आयोगाने सर्व राज्यांकडून मतदान व्यवस्थेच्या तयारीचा अंतिम आराखडा मागवला आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक आयोगाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. छत्तीसगड आणि झारखंडसारख्या राज्यांत हेलिकॉप्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार आहे. घनदाट जंगलांचे प्रदेश असलेल्या या राज्यांतील डझनाहून अधिक जिल्ह्यांत किमान सुमारे दोनशे मतदान केंद्रांवर हेलिकॉप्टरने मतदानयंत्रे व कर्मचाऱ्यांना पाठवण्यात येणार असून, त्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी हवाई दल, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आदींची मदत घेण्यात येत आहे.शिमला परिसर व अन्य डोंगराळ भागात घोडे व खेचरांद्वारेही वाहतूक केली जाईल. बिहार, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, आसाम आणि ओडिशा यासह डझनभर राज्यांतील अनेक जिल्ह्यांमध्ये मतदान कर्मचारी व साहित्याची ने-आण करण्यासाठी बोटींचीही व्यवस्था करण्यात आली आहे.