
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह अन्य आरोपींना आरोपमुक्त करण्याच्या विशेष एसीबी न्यायालयाच्या आदेशाला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्याची दखल घेऊन उच्च न्यायालयाने भुजबळ कुटुंबीयांसह अन्य आरोपी; तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) सोमवारी नोटीस जारी केली आहे. तसेच, याचिकेबाबत भूमिका मांडण्याचे निर्देश न्या. श्रीराम मोडक यांनी दिले आहेत.विशेष एसीबी न्यायालयाने सप्टेंबर २०२१मध्ये या प्रकरणातून सार्वजनिक विभागाचे तत्कालीन सचिव व राज्याचे माजी माहिती आयुक्त दीपक देशपांडे यांना वगळून छगन भुजबळ यांच्यासह मुलगा पंकज, पुतण्या समीर व इतरांना आरोपमुक्त केले होते. त्या निर्णयास ‘एसीबी’ने आव्हान दिले नाही. मात्र, दमानिया यांनी उच्च न्यायालयात त्यास आव्हान दिले आहे. त्याचप्रमाणे देशपांडे यांनी एसीबी न्यायालयाच्या आरोपनिश्चितीच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात केली आहे; तसेच आपल्या याचिकेवर अंतिम निर्णय येईपर्यंत आरोपनिश्चितीपासून दिलासा देण्याची मागणी केली आहे. त्यावरही दमानिया यांनी हस्तक्षेप अर्ज केला आहे.