https://ift.tt/1ZM6gep
इस्लामाबाद: गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशभरात सुरु असलेल्या लोकसभा निवडणूका अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. १ जून अखेर एकूण सात टप्प्यांमधील मतदानाची प्रक्रीया पुर्ण झाली असून आता संपूर्ण देशाला निकालांची प्रतिक्षा लागली आहे. देशवासीयांसाठी बहुप्रतिक्षित असलेल्या लोकसभा निवडणूकांचे निकाल ४ जून रोजी जाहीर होत आहेत. पण भारताच्या निकालांबद्दल पाकिस्तानमध्येही उत्सुकता बघायला मिळत आहे. मतदानानंतर जाहीर झालेल्या बहुतांश मधून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भारतीय जनता पक्षांला पूर्ण बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. एक्झिट पोल मधील अनुमानांची पाकिस्तानला मात्र धास्ती लागलेली आहे.
एक्झिट पोलच्या अंदाजाची पाकिस्तानला भिती
पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन' ने भारतातील निवडणूकांच्या एक्झिट पोलबद्दल प्रसिद्ध एका वृत्तात म्हटले होते की,भारतात एक्झिट पोलचे रेकॉर्ड खराब आहे. कारण त्यांचे निवडणूकांचे अंदाज नेहमी चुकीचे ठरत आलेले आहेत. यामध्ये हे देखील म्हटले होते की भारतासारख्या विविधता असलेल्या देशात असे अंदाज खरे ठरणे एक आव्हान आहे. तसेच काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे माजी विदेश सचिव एजाज चौधरी यांनी प्रंतप्रधान मोदींच्या कारकिर्दीबद्दल चिंता व्यक्त करत म्हटले होते की मोदींच्या नेतृत्वातील सरकारमध्ये निवडणूकीतील घोषणांची तंतोतंत अंमलबजावणी केली जाते त्यामूळे यावेळी ते सत्तेवर आले तर ते हिंदू राष्ट्र स्थापन करण्यासाठी पाकिस्तान विरुद्ध आक्रमत पवित्रा घेतील अशी भीती व्यक्त केली होती.
मोदींच्या पराभवाबद्दल उत्सुक पाकिस्तान
पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की नरेंद्र मोदी निवडणूकीत पराभूत व्हावेत ही, अनेक पाकिस्तानी नागरिकांची इच्छा आहे. एक महिन्यांपूर्वी त्यांनी केलेल्या एका ट्वीट मध्ये राहुल गांधी यांचे समर्थन केले होते. त्याचबरोबर त्यांनी अरविंद केजरीवाल यांना द्वेष आणि अतिरेकी शक्तींना पराभूत करण्याचे अवाहन ट्वीटद्वारे केले होते. यावर गुजरात मधील एका सभेत नरेंद्र मोदी यांनी टिकास्त्र सोडले होते. यामध्ये त्यांनी म्हटले होते की, "इथे काँग्रेस मरत आहे आणि तिकडे पाकिस्तान रडत आहे. काँग्रेससाठी आता पाकिस्तान प्रार्थना करत आहे. राजकूमाराला पंतप्रधान करण्यासाठी पाकिस्तान उतावळा झाला आहे." भाजपकडून झालेल्या टीकेनंतर लगेचच राहूल गांधी आणि केजरीवाल यांनी त्या ट्वीटपासून स्वत:ला वेगळे केले होते.
पाकिस्तान मोदींना का घाबरतोय ?
मोदींच्या पुन्हा पंतप्रधान बनन्याची पाकिस्तानला धास्ती आहे.मोदींच्या कार्यकाळात पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांबाबत वेळोवेळी मोदींनी घेतलेला आक्रमक पवित्रा याला कारणीभूत आहे. याला खुद्द पाकिस्तानच्या एका खासदाराने दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले होते की त्यांच्या एका विदेश मंत्र्याला भारत पाकिस्तानवर हल्ला करेल याची भिती होती. पाकव्याप्त काश्मीर मध्ये घुसून भारतीय सैन्यदलाने ४० हून अधिक दहशतवादींचा खात्मा केला होता. मोदी परत सत्तेवर आले तर ते पाकिस्तानच्या प्रत्येक कारवाईला चोख प्रत्युत्तर देतील याची पाकिस्तानला भिती आहे.
अनुच्छेद ३७० हटवून पाकिस्तानला दिलेला शह
आपल्या निवडणूकीच्या जाहीरनाम्यामध्ये भाजपने नेहमीच काश्मीरचा प्रश्न लावू्न धरला होता. २००९ पासून भाजपने कलम ३७० रद्द करणे,निर्वासितांना हक्क प्रदान करणे,दहशतवादाचा निपटारा करणे,जम्मू-काश्मीर आणि लडाख मध्ये त्रिमार्गी विकास आराखडा राबविणे यांसारख्या धोरणांचा उघड पुरस्कार केला होता. ५ ऑगस्ट २०१९ रोजी आपल्या दुसऱ्या कार्यकाळात भाजप सरकारने ३७० कलम रद्द केले आणि जम्मू आणि काश्मीरला केंद्र शासित प्रदेशांमध्ये परावर्तीत केले. हा पाकिस्तानसाठी खुप मोठा धक्का होता. कलम ३७० रद्द केल्यानंतर २०२४ मधील झालेल्या या पहिल्या निवडणूकीमध्ये मतदानाच्या टक्केवारीमध्ये २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याद्वारे काश्मीरच्या जनतेने भारतीय राज्यव्यवस्थेमध्ये स्वत:ला सामावून घेतल्याचे भाजपकडून बोलले जात आहे. पाकिस्तानचा मात्र यामूळे जळफळाट होत आहे.