
गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहे. नोव्हेंबर महिन्यात चक्क पाऊस पडताना दिसला. राज्यात आता गारठा वाढला असून थंडीच्या लाटेचा मोठा इशारा देण्यात आलाय. मात्र, देशावरील पावसाचे ढग अजूनही कायमच असल्याचे बघायला मिळतंय. अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. पुण्यात थंडीचा कडाका वाढला किमान तापमान 10.6°c वर पोहोचले आहे. गेल्या दोन दिवसांपासून स्थिर असलेल्या किमान तापमानात मोठी घट झाली आहे. परिणामी शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे पुणेकर चांगलेच गारठले आहेत. मात्र, पुढील दोन ते तीन दिवसात कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला. निफाड, धुळ्यात पारा आठ अंशावर पोहोचला. उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह सुरू असल्याने राज्यातील थंडी वाढली आहे. पहाटे धुके पडत असून दव पडत आहेत, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीच्या लाटेची शक्यता असल्याने सावधगिरीचा इशारा देत येलो अलर्ट देण्यात आलाय. उर्वरित राज्यात गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
परभणीमध्य़े 8.5 अंश तापमानाची नोंद झाली. गोदिंया, जेऊर, भंडारा 10 अंशपेक्षाही कमी तापमानाची नोंद झाली. राज्यात जरी थंडी वाढत असतील तरीही देशातील काही राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला. तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये पावसासह जोरदार वारे वाहणार आहे. काल केरळच्या काही भागांमध्ये पाऊस झाल्याची माहिती असून असूनही मुसळधार पावसाचे संकट कायम आहे.
17, 18, 19, 20 नोव्हेंबरदरम्यान पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. केरळमध्ये पुढील काही दिवस पाऊस बघायला मिळेल. 17 ते 20 नोव्हेंबर दरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विजांचा कडकडाट यासोबतच पुराचा धोका देखील असणार आहे. मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. राज्यातील काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. यासोबतच पंजाब आणि हरियाणामध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.