भाजपची कसोटी; ५ मुस्लिमांना हवी उमेदवारी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, September 30, 2019

भाजपची कसोटी; ५ मुस्लिमांना हवी उमेदवारी

https://ift.tt/2ouITwj
मुंबई: 'सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास' असा घोष करणाऱ्या भाजपची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटप करताना कसोटी लागणार आहे. कारण, महाराष्ट्र भाजपमधील पाच मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत केवळ एका मुस्लिम कार्यकर्त्याला तिकीट देणारा भाजप आता किती मुस्लिमांना तिकीट देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबई भाजपचे उपाध्यक्ष हैदर आझम यांनी मालाड मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गेल्या दोन दशकांपासून ते पक्षाशी जोडलेले आहेत. यावेळी आपल्याला तिकीट मिळावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. 'भाजपनं मुस्लिम व्यक्तीला तिकीट दिलं तरच मुस्लिम मतदारांना भाजपला मत देण्यासाठी राजी करता येईल. 'सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास' हा अजेंडा त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवता येईल,' असं आझम म्हणाले. ठाणे जिल्ह्यातील मुस्लिमबहुल मुंब्रा मतदारसंघातून रीदा रशीद यांनी उमेदवारी मागितली आहे. 'मुस्लिमबहुल भागांतून एखादी मुस्लिम व्यक्ती भाजपच्या तिकिटावर निवडून आल्यास ती तेथील मतदारांचे प्रश्न सहजपणे समजू शकते आणि मांडू शकते. त्या माध्यमातून मुस्लिम समाज आणि भाजपमध्ये जवळीक वाढण्यासही मदत होईल, असं राशीद म्हणाल्या. २०१४ च्या निवडणुकीत भाजपनं पाशा पटेल यांना औसा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, हे तिकीट मिळण्याशी त्यांच्या मुस्लिम असण्याचा फारसा संबंध नव्हता. पाशा पटेल हे शेतकरी नेते आहेत. मराठवाड्यातील काही भागांत त्यांचा प्रभाव आहे. हे लक्षात घेऊन त्यांना तिकीट देण्यात आले होते. मात्र, त्यांचा पराभव झाला.